अमरावती,दि.30 : महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे नैराश्यातून चांदुरबाजार तालुका कृषी कार्यालयात ३० जुलैला दुपारी दीडच्या सुमारास एका शेतकऱ्याने विष प्राशनाचा प्रयत्न केला. तालुका कृषी अधिकारी, प्रहार कार्यकर्त्यांनी हा अनर्थ टाळला.युनूसखाँ महम्मदखाँ (४२, रा. तळेगाव मोहना) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दोन हेक्टर शेतात २८ जूनला सोयाबीनची पेरणी केली. परंतु, महाबीज कंपनीचे जे/एस ९३०५ बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे पेरणी व उत्पादन असे १ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे.
महाबीजच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई मिळणार नाही, दुसऱ्या पेरणीकरिता महाबीजकडून बियाणे मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. सोमवारी तालुका कृषी कार्यालयात आपली व्यथा मांडताना युनूसखाँ यांनी थैलीतील बाटली काढून विष पिण्याचा प्रयत्न केला. यावेळी तालुका कृषी अधिकारी व प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश इंगोले, मनोज भुगूल, ऋषीकेश पोहोकार, अनुज भुजबळ, अनिकेत ठाकरे, भूषण चर्जन यांनी अप्रिय घटना टाळली.