
मुंबई (प्रतिनिधी) : शेतक-यांच्या प्रश्नांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र करत भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणा-या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले पुन्हा आक्रमक झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. येत्या १७ तारखेपर्यंत जर पंतप्रधान यांनी शेतक-यांबाबत निर्णय घेतला नाही तर, स्वत: या लढाईत सहभागी होण्याची तयारी दाखविली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विधानसभा अध्यक्षांनी शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याची विनंती केली आहे. शेतक-यांनी सुरू केलेले आंदोलन हे त्यांच्या अस्मितेची लढाई नसून अन्नदाता शेतक-याच्या अधिकाराची लढाई आहे. त्यामुळे या आंदोलनाला आपलाही पाठिंबा असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. जर मोदी यांनी हा शेतकरी विरोधी कायदा परत न घेतल्यास आपणही दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशाराही पटोले यांनी या पत्रात दिला आहे.
नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारले असता म्हणाले, की मी भाजपचा खासदार असताना २०१७ मध्ये आवाज उठवत शेतक-यांवर अन्याय होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. पण, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याने त्या पदाचा राजीनामा दिला होता. जिथे शेतक-यांवर अन्याय होईल तिथे शेतक-यांच्या आंदोलनात सहभागी होऊन शेतक-यांना न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे.





