
मुंबई – उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं फडणवीस मोदींना सांगतील का, असा खोचक सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का, याचा विचार झाला पाहिजे. मात्र, केंद्र सरकार प्रत्येकवेळी आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेते. तुमचे लोक प्रचार करत आहेत किंवा निवडणुका आहेत म्हणून माणसं मारता येणार नाही, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. लोकांना लॉकडाऊन नको, असं त्यांनी सांगितले. हे अगदी योग्य आहे. मात्र ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. पण मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय फडणवीसांकडे आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.
दरम्यान, पुण्यात भाजपचा महापौर असल्याने केंद्र सरकारने थेट तिकडे लसींचा साठा पाठवला. हा खोटारडेपणा झाला. पुण्याला लसी मिळत असतील तर मुंबईलाही मिळाल्या पाहिजेत. अन्यथा राजू शेट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे सीरम इन्स्टिट्यूटमधून लसीचा एक ट्रकही बाहेर पडू देणार नाही, ही भावना लोकांच्या मनात वाढीस लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.





