
नाशिक,दि.18ः- स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ते वाचवण्याबरोबरच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने गुरुवारी (दि. १७) नाशकातील द्वारका चौकात निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. समता परिषदेचा नाशिक बालेकिल्ला असल्यामुळे या ठिकाणी भुजबळ समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न झाला.
‘ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, “ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो,’ “ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे,’ “जय ज्योती जय क्रांती,’ “ओबीसींचे राजकीय आरक्षण,’ “हा आमचा हक्क आहे.’ हक्काचे आरक्षण आमची चळवळ, न्याय नाही हक्क आहे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी, अशा घोषणा देत द्वारका भागातील चारही बाजूंनी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले.या वेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करून सुटका करण्यात आली. यावेळी ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणनेसह इतर मागण्याही करण्यात आल्या.





