
१५ वर्षांपासून बंद पडलेली मंडईची परंपरा पुन्हा सुरू
चित्रा कापसे/तिरोडा,दि.०४ः तालुक्यातील ग्राम चुरडी येथे काल झालेल्या मंडई व मराठी लावणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा परिषद सदस्या सौ अॅड.माधुरीताई रहांगडाले म्हणाल्या की मंडई आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढीस येते.सर्व धर्म समभावाची भावना नागरिकांमध्ये जागृत होते.आणि चैतन्यमय वातावरण निर्माण होऊन गावात आनंदी आनंद दरवळतो. मी भाग्यवान आहे की माझे माहेर चुरडी असून याच गावातील मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपद मला दिले.माझ्या माहेर व सासरच्या जिल्हा परिषद क्षेत्राचे नेतृत्व करीत असून मला आपण समस्त जनतेने सेवा करण्याची संधी दिली.
चुरडी येथील युवा मित्र मंडळाच्या वतीने कबड्डी ग्राउंड चुरडी येथे दुपारी ३ वाजता दंडार व रात्री ८ वाजता मराठी लावणीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा परिषद सदस्या सौ माधुरीताई रहांगडाले यांनी घोषणा केली की मागील १५ वर्षांपासून बंद पडलेली मंडईची परंपरा आता यापुढे दरवर्षी थाटामाटात व हर्षोल्लासात साजरी करण्यात येईल.यावेळी कार्यक्रमात गावातील सरपंच सपनाताई इनवाते, पोलीस पाटील कविताताई मुरे, तृप्तीताई भोयर,गीताताई बिसेन,राजू भोयर, प्रफुल्ल बिसेन, गजानन बिसेन,निगम सोनेवाने,उमेश भोयर व गावातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते, परीसरातील मंडई प्रेमी मंडळींनी दंडार व रात्री झालेल्या मराठी लावणीच्या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला.





