
राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी सरकारकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात कोणते आणि किती धान्य मिळणार आहे याची माहिती दुकानात गेल्यावरच मिळत होती. मात्र आता नागरिकांना रेशन दुकानात जाण्याआधीच त्यांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे धान्याचा तपशील मिळणार आहे. त्यामुळे धान्य वितरणात पारदर्शकता येण्याची शक्यता वाढली असून ही सोय नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. (Ration Card News)
राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि अनियमितता रोखण्यासाठी पुरवठा विभागाने ही नवी प्रणाली लागू केली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांना या एसएमएस सेवा मिळण्यास सुरुवात झालेली असून यात ज्वारी, तांदूळ आणि गहू किती किलो देण्यात येणार आहे याची स्पष्ट माहिती नमूद केली जाते.
मोबाइलवर मिळणार अचूक धान्याचा हिशोब :
नवी प्रणाली लागू झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला धान्य वाटपापूर्वीच संदेश मिळणार आहे. या संदेशात मिळणाऱ्या धान्याचा प्रकार, प्रमाण आणि महिन्याची नोंद असेल. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत हे धान्य पूर्णपणे मोफत असल्याची माहितीही संदेशात नमूद केली जात आहे.धान्य घेतल्यानंतर पावती घेणे अनिवार्य असल्याचेही एसएमएसद्वारे सूचित करण्यात येत आहे, ज्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
पुरवठा विभागाने लाभार्थ्यांना तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांना काहीही अडचण आल्यास ते 1800-224950 किंवा 1967 वर संपर्क साधू शकतात.याशिवाय संदेश न मिळाल्यास लाभार्थी ‘मेरा रेशन अॅप’ वर आपला आधार क्रमांक टाकून धान्याचा कोटा तपासू शकतात. या अॅपमुळे मंजूर धान्य आणि प्रत्यक्ष मिळालेल्या वाट्यामध्ये फरक ओळखणे सुलभ झाले आहे.
मोबाइल नंबर लिंक असणे अनिवार्य :
एसएमएस सेवा फक्त त्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे ज्यांचा मोबाइल क्रमांक त्यांच्या रेशनकार्डशी जोडलेला आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी अपडेट केले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या रेशन दुकानात जाऊन नंबर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सध्या या नव्या तांत्रिक प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्याचे पुरवठा विभागाने मान्य केले आहे. काही लाभार्थ्यांना चुकीचे संदेश मिळाल्याच्या तक्रारींवर तपास सुरू असून प्रणालीचे अपडेटिंग युद्धपातळीवर करण्यात येत आहे.





