
गोंदिया- सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथे रंगपंचमीच्या सणानिमित्त रंग खेळल्यानंतर दुपार दरम्यान तलावात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सागर गहाणे (वय १६) तसेच प्रणय गहाणे (वय १३) असे मृतकांचे नाव आहे. रंगपंचमी सारख्या सणाला गावात अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज रंगपंचमी सारखा सण असल्यामुळे गावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यातच सकाळच्या सुमारास गावातील पुरुष, महिला, मुले यांनी एकमेकांवर प्रेमाने बेभानपणे रंगीबेरंगी रंगाचा वर्षाव केला. रंग खेळता खेळता दुपार झाली. यात मृतक सागर तसेच
प्रणव यांनी गावच्या तलावात आंघोळ करावी असा बेत केला. आणि दुपार दरम्यान दोघेही जण गावच्या तलावात आंघोळीला गेले. दोघेही आंघोळ करताना तलावातील पाण्याचा अंदाज चुकला. आणि पाहताच, दोघेही तलावातील पाण्यामध्ये बुडू लागले. आणि शेवटी त्या पाण्यात दोघांच्याही बुडून करून अंत झाला.
ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकरी धावतच घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती डुग्गीपार पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळतात क्षणाचाही विलंब न करता पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघेही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. आकस्मित गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला.





