घरफोडी-लुटमारीच्या गुन्ह्यात सर्वाधिक बालगुन्हेगार महाराष्ट्रात

0
19

गोंदिया : चोरी, घरफोडी, लुटमार आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक बालगुन्हेगार महाराष्ट्रात असून दुसऱ्या स्थानावर तमिळनाडू आहे, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.देशात १० हजार १० गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असून त्यांनी चोरी, घरफोडी, दरोडा, लुटमार आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे घडवून आणले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक १४२६ अल्पवयीन गुन्हेगार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू असून ९५२ गुन्हेगारांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर ओडिशा (८८४), राजस्थान (८५७) आणि मध्यप्रदेश (७७७) आहे. अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये बिहार-उत्तरप्रदेशसारख्या राज्याला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. देशात ६ हजार ४९५ अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश चोरीच्या गुन्ह्यात तर घरफोडीच्या गुन्ह्यात २ हजार ३० बालगुन्हेगारांचा समावेश आहे. अनेक मोठ्या गुन्हेगारांच्या टोळीत अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येतो. अशा गुन्हेगारीतून अल्पवयीन गुन्हेगार बाहेर पडणे कठीण असते.

सर्वाधिक विधिसंघर्षग्रस्त बालक मुंबई आणि पुण्यात आहेत. बाल गुन्हेगारांमध्ये नागपूर तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत सर्वाधिक ३६३ बालगुन्हेगारांची नोंद करण्यात आली तर पुण्यात २७८ आणि नागपुरात २१० बालगुन्हेगारांची नोंद करण्यात आली. छत्रपती संभाजी नगर, नाशिक जिल्ह्यात बालगुन्हेगारी कमी असल्याचे आढळून आले.

एखाद्या गुन्ह्यात १४ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश असल्यास पोलीस त्यांची बालगुन्हेगार म्हणून नोंद करतात. मात्र, त्यांना बालगुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत नाहीत. चोरी-घरफोडीसारख्या गुन्ह्यात अल्पवयीन आरोपींबाबत पोलिसांची कायमच नकारात्मक भूमिका असते. त्यामुळे महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.