Home शैक्षणिक राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठास प्रथम क्रमांक

राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठास प्रथम क्रमांक

0

मुंबई, दि. २२ मार्च: आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करत सर्वसाधारण सुवर्ण पदक पटकावले असून या स्पर्धेत विद्यापीठास प्रथम क्रमांक मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारतीय विद्यापीठ संघातर्फे (एआययु) १६ आणि १७ मार्च २०२३ रोजी गणपत विद्यापीठ, महेसाना, गुजरात येथे या या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी विद्यापीठामार्फत ‘सामाजिक शास्त्रे,  मानव्यविज्ञान,  वाणिज्य, व्यवस्थापन’, ‘मुलभूत शास्त्रे’, ‘अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान’, ‘शेती’ आणि ‘वैद्यक शास्त्रे’ या पाच वर्गवारीतून सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विद्यापीठास संपूर्ण वर्गवारीतून सुवर्ण पदक तर ‘सामाजिक शास्त्रे, मानव्य विज्ञान आणि व्यवस्थापन’ या वर्गवारीत सुवर्ण पदक, वैद्यक शास्त्रात सुवर्ण पदक तर अभियांत्रिकी वर्गवारीत रौप्य पदक मिळाले आहे.  संकेत शिरोडकर या विद्यार्थ्यास वैद्यक शास्त्र वर्गवारीत सुवर्ण पदक, सामाजिक शास्त्रे या वर्गवारीतून स्वराज मिश्रा यांस सुवर्ण पदक तर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या वर्गवारीतून विशाल पेडणेकर, निधी शेट्टीगर आणि सायली ठवरे या विद्यार्थ्यांस रौप्य पदक मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के, प्रभारी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि वित्त व लेखा अधिकारी प्रा. (सीए) प्रदीप कामथेकर यांनी स्पर्धेतील सर्व विजयी चमूचे अभिनंदन करुन त्यांच्या भविष्कालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शनार्थ या स्पर्धेसाठी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉ. मिनाक्षी गुरव, संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. भूषण लांगी आणि डॉ. रूपा राव यांनी काम पाहिले तर मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. शशिकुमार मेनन,    प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रूपा राव आणि  डॉ. मनीष देशमुख यांनी काम पाहिले.

“संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने सातत्याने केलेल्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे आज राष्ट्रीय स्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकीक होतो आहे, हे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविण्यता आणि कल्पकतेच्या जोरावर अन्वेषण सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे.” –  प्रा. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ)

error: Content is protected !!
Exit mobile version