अवसरी येथील शैक्षणिक संकुल राज्यातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरेल – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

0
12

अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन आणि एकत्रित सभागृह इमारतीचे भूमिपूजन

पुणे दि.5: अवसरी येथील शैक्षणिक संकुल राज्यातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरणार आहे. उच्च तंत्रशिक्षण घेणाऱ्‍या विद्यार्थ्यांना येथील शैक्षणिक संकुलनाचा निश्चितपणे फायदा होईल, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज व्यक्त केले.

अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील शासकीय महाविद्यालयातील विस्तारीत इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि एकत्रित सभागृह इमारतीचा भूमीपूजन माजी केंद्रिय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार संजय राऊत, अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता बी.एन.बहिर,तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ.अभय वाघ, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणेचे सहसंचालक डॉ.दत्तात्रय जाधव, अवसरी खुर्दचे सरपंच जगदिश अभंग उपस्थित होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, अवसरी येथील शैक्षणिक संकुल राज्यातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरणार आहे. येथे शासकीय निधी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण सहकार्य केले आहे. शैक्षणिक सुविधा उभी राहिली आहे. याचा फायदा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग कॉलेज तसेच इतर कार्यक्रमांसाठीही होणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, अवसरी येथे शैक्षणिक संकुल उभे राहिले याचा आपल्याला मनस्वी आनंद झाला. उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकुलचा निश्चितपणे फायदा होईल. साखर कारखान्यामुळे या परिसरातील शेतीच्या अर्थकारणाला गती मिळाली असून 16 लाख लीटर दुधाचे उत्पादन येथे होते. शेतीसोबतच दुग्धव्यवसायातील प्रगतीही चांगली आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, अवसरी येथे अभियांत्रिकी महाविद्यालयासारखेच महाविद्यालय रत्नागिरी येथे उभे करणार आहे. राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभाग देशातील एक आदर्श विभाग ठरेल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगले काम करून या विभागाला आणखी उंचीवर नेणार असल्याचे सांगून अवसरी येथे झालेल्या शैक्षणिक सोईसुविधेबाबत त्यांनी कौतुक केले.

खासदार संजय राऊत म्हणाले, अवसरी सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक नंदनवन फुलले आहे.या संकुलातुन तयार होणारे हजारो विद्यार्थी राज्य व देशाच्या स्तरावर जातील व अवसरीचे नाव पुढे नेतील.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले.