मुंबई, ठाणे वगळता राज्यात आजपासून भारनियमन

0
152

मुंबई : राज्यात विजेची वाढती मागणी, त्या तुलनेत उत्पादन कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून (मंगळवार) सर्वसामान्यांना भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील ग्राहकांना याचा फटका बसणार नसल्याचे महावितरणने सांगितले आहे. दरम्यान महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, कोळशाच्या कमतरतेमुळे थर्मल स्टेशन्समधून सहा हजार मेगावॅट वीज पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी दररोज सकाळी ६ ते सकाळी १० आणि संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीज वाचवण्याचे आवाहनही केले आहे.

देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेच्या पुरवठ्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाले आहे. त्यामुळे हे भारनियमन केले जात आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला २,५०० ते ३,००० मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे. आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, तसेच ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे राज्यभरात २.८ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. यातील काही भागांत मंगळवारपासून भारनियमन केले जाणार आहे. राज्यभरातील अलीकडील विजेची सर्वोच्च मागणी फेब्रुवारीमध्ये २६ हजारवरून एप्रिलमध्ये वाढून २८ हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. लवकरच ही मागणी ३० हजार मेगावॅटवर पोहोचू शकते, असा अंदाज एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ज्या ठिकाणी वीज चोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे, अशा ठिकाणी आम्ही भारनियमन करू. यामध्ये जी १, जी २ आणि जी ३ श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे. जे बहुतांशी मुंबई महानगर भागातील कल्याण भागात आहेत. भांडुप-मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबई येथे महावितरणचे भारनियमन करणार नाही, कारण या भागात वीज वितरण चांगले आहे, तसेच इतर भागांच्या तुलनेत बिल वसुली देखील उत्तम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांना भारनियमनाचा सामना करावा लागणार आहे. काही शहरी भागात, आम्ही वीज खंडित करत असलो तरीही, आम्ही ते दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आखत आहोत.