१ मे, महाराष्ट्र दिनी राज्यातील गावागावात, झेंडा वंदनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहितीपत्रिका पोहोचणार

0
40

लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती

मुंबई (दि. 21) : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपूर्ण महाराष्ट्रात येत्या १ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अंमलात आणली असून यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार दि. १ मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध राज्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचनही करण्यात येणार आहे.

यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, सामाजिक न्याय विभागाने राज्य निर्बंध मुक्त होताच धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ११ दिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरी केली.

राज्य सरकारने दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केला असून, या कालावधीत धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये कालानुरूप सकारात्मक बदल केले आहेत. त्या बदलांचे सकारात्मक परिणाम लाभार्थींच्या टक्केवारीत दिसून येत आहेत. अनेक योजना नाविन्यपूर्ण रीतीने राबविणे, नवीन काही योजना अंमलात आणणे, याद्वारे विभागाच्या कार्याचा एक वेगळा ठसा या काळात उमटवला आहे.

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक यांसह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत, या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान दि. 01 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झेंडावंदन होणाऱ्या सर्व शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहितीपत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले असून, समाज कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांच्या मार्फत या अभिनव उपक्रमाची येत्या महाराष्ट्र दिनी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.