Home महाराष्ट्र प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

0

अलिबाग, दि.23:- पत्रकारांची पेन्शन, त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी आदी प्रश्न सोडविण्याचा शासनाच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  येथे केले.

रायगड प्रेस क्लबच्या 16 वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा रायगड प्रेस क्लब व माणगाव प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित केला होता, या प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

यावेळी ज्येष्ठ माध्यमकर्मी व प्रमुख मार्गदर्शक समीरण वाळवेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शक एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोकण विभाग मराठी पत्रकार परिषद सचिव विजय मोकल, मेघराज जाधव, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, माजी अध्यक्ष अनिल भोळे, अभय आपटे, मिलिंद अष्टीवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी श्री.देशमुख यांच्या मागणीचा संदर्भ देत पत्रकार पेन्शन योजनेसाठी 35 कोटींची तरतूद केली आहे त्याचबरोबर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले.

शहरी भागाइतकीच ग्रामीण भागातील पत्रकारिताही सजग पत्रकारिता आहे. मात्र आजच्या काळात केवळ पत्रकारिता करून आपले कुटुंब चालविणे अशक्य असल्याने पत्रकारांनी या क्षेत्राशी निगडीत असलेले अन्य कौशल्य जाणून घेणे गरजेचे असल्याचा मौलिक सल्ला देवून ज्येष्ठ माध्यमकर्मी समीरण वाळवेकर पुढे म्हणाले की, वृत्तपत्र मालकांमध्ये भांडवलदारांचा दबाव गट निर्माण झाल्याने आताचा काळ हा पत्रकारांसाठी कठीण काळ आहे.पत्रकारिता म्हणजे कष्टाच्या भाकऱ्या भाजण्याचे काम झाले आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वसामान्यालाही आपली मते मांडता येऊ लागली आहेत. त्यामुळे पत्रकारांनाही आपल्यात काळानुरूप बदल करायला हवे. जाहिराती हा वृत्तपत्राचा श्वास झाला असून या जाहिरात गोळा करण्याचा भार थेट पत्रकारांवर येऊन पडत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी केवळ पत्रकारितेवर अवलंबून न राहता या क्षेत्राशी निगडीत अन्य कौशल्य आत्मसात करून जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा.

एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित असून माहिती खात्याच्या राज्यमंत्री म्हणून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आदिती तटकरे यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. राज्यात 300 ज्येष्ठ पत्रकारांना जरी पेन्शन सुरु झाली असली तर आणखी 300 पत्रकार पेन्शन योजनेच्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे सांगितले.

सुरुवातीस आपल्या प्रास्ताविकामध्ये भारत रांजणकर म्हणाले की, एस.एम.देशमुख यांनी तरुण पत्रकारांना एकत्र करून 2005 साली रायगड प्रेस क्लबची स्थापना केली. गेली 16 वर्षे विविध सामाजिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न संघटनेमार्फत केला जात आहे. घोणसे घाट, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आंदोलन, महामार्गाचे बाळ शास्त्री जांभेकर महामार्ग नामकरण, पाणीटंचाई निवारणासाठी उपक्रम, बांधावर जाऊन शेतकरी सन्मान असे उपक्रम संघटनेने राबविले आहे. रायगड प्रेस क्लबने सुरु केलेला बांधावर जाऊन शेतकरी सन्मान हा उपक्रम शासनानेही सुरु केला, हे प्रेस क्लबचे यश आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार सन्मान पुरस्कार व विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक अजित वरपे ( संपादक दैनिक झुंजार नेता बीड ), जीवन गौरव पुरस्कार विजय मांडे कर्जत, स्व. निशिकांत जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार मेघराज जाधव मुरुड, उदय कळस म्हसळा, स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भिड पत्रकार पुरस्कार प्रफुल्ल पवार अलिबाग, स्व. संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कार हरेश मोरे साई, सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार सीमा मोरे, उत्कृष्ट छाया चित्रकार पुरस्कार प्रकाश माळी पेण, प्रसाद पाटील महाड , श्रमिक पुरस्कार नंदकुमार मरवडे रोहा, आनंद पवार रसायनी, संतोष शिलकर श्रीवर्धन, एस.टी. पाटील खालापूर यांना देण्यात आला. तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार संजय अण्णा ढवळे, बाबुशेठ खानविलकर, आरोग्य सेवा पुरस्कार डॉ. इस्माईल रहाटविलकर, यशस्वी मराठी उद्योजक पुरस्कार दिपक जाधव, संतोष वरपे, डॉ. संजय सोनावणे यांना प्रदान करण्यात आला.

सूत्रसंचलन सुधीर शेठ यांनी तर आभार कार्याध्यक्ष मनोज खांबे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माणगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, पद्माकर उभारे, गौतम जाधव, पूनम धुमाळ आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!
Exit mobile version