मुंबई- राज्याच्या विविध भागातून मुंबईत मंत्रालयात कामे घेवून हजारो नागरिक येत असतात. त्यांना मंत्रालयात प्रवेशासाठी पास घेवूनच प्रवेश करणे बंधनकारक आहे. तो मिळवण्यासाठी आणि त्यानंतर प्रवेशासाठी त्यांना दोन ते अडीच तास रांगेत ताटकळत बसावे लागते. त्याचा तेथील सुरक्षा यंत्रणेवर ही ताण पडतो. नवीन वर्षात लोकांचा हा त्रास कमी होणार असून यासाठी मंत्रालय प्रशासनाकडून “डिजी प्रवेश” नावाचे एप तयार करण्यात येत असून, महिनाभरात ही सुविधा सुरू होणार आहे. या एपच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या मंत्रालयाचा प्रवेश पास काढता येणार आहे.
कॅबिनेट मीटिंगच्या दिवशी मंत्रालयात येणाऱ्यांचा आकडा पाच हजारावर जातो. दुपारी दोननंतर मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी खिडकीवरून आधार कार्डच्या आधारे प्रवेश पास दिला जातो. त्यानंतर पोलिसांकडून तपासणी करून मंत्रालयातील गार्डन गेटमधून नागरिकांना प्रवेश दिला जातो. खिडकीवर पास काढण्यासाठी आणि मंत्रालयात जाण्यासाठी दोन्हीकडे साधारण एक ते दीड किमीपर्यंतची रांग लागलेली असते. सुरक्षा यंत्रणेवरही मोठा ताण पडत आहे. तो एपमुळे कमी होईल, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. १ जानेवारी २०२५ पासून मंत्रालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी एफआरएस प्रणाली (फेशियल रेकग्निशन सिस्टम) सुरू होत आहे. यासाठी मंत्रालयातील प्रत्येक गेटवर साधारण २९ ठिकाणी “फ्लॅप बॅरियर” बसविण्यात आले आहेत.
डीजी प्रवेश एपवर नोंदणीनंतर एक क्रमांक किंवा कोड मिळणार आहे. मंत्रालयात एन्ट्री गेटजवळ हा कोड अथवा क्रमांक स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर ओळखपत्र दिले जाईल. एफआरएस प्रणालीद्वारे त्या व्यक्तीची ओळख तपासली जाईल व त्यानंतरच त्याला प्रवेश दिला जाणार आहे.