Home महाराष्ट्र २० वर्षांपूर्वी सक्रिय होता नागझिरा दलम

२० वर्षांपूर्वी सक्रिय होता नागझिरा दलम

0

भंडारा-राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील २२ तालुके नक्षलमुक्त करण्यात आले ेअसून तिथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, २० वर्षांपूर्वी साकोली तालुक्यात नागझिरा दलम सक्रीय होता, अशी पोलीस प्रशासनाच्या दप्तरी नोंद आहे.
आघाडी शासनाच्या कार्यकाळात भंडारा जिल्ह्यताीतील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्याचाही नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. आता नवीन सरकार सत्तारुढ झाल्यानंतर भंडारा जिल्ह्याला नक्षलमुक्त केले आहे.
नागझिरा अभयारण्य पुर्वीपासून घनदाट जंगलाने आणि टेकड्यांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांचे ‘रेस्ट झोन’ होते. २० वर्षांपुर्वी म्हणजे भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे एक असताना या अभयारण्यात नागझिरा नामक दलम सक्रीय होते. त्यावेळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती. त्यावेळी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक पोलिस कर्मचारी शहीद झाला होता.
साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक कर्मचारी चकमकीत जखमी झाल्याचीही नोंद आहे. त्या काळात नक्षल कारवाया मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्याच्या गृह मंत्रालयाने नक्षलवाद्यांच्या कारवायावर नजर ठेवण्यासाठी देवरी उपविभागाची स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्यानंतर या विभागामधूनच पोलिसांकडून नक्षलग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत होती.
कालांतराने भंडारा जिल्ह्याची विभागणी झाली. आणि हा भाग गोंदिया जिल्ह्यात समाविष्ट झाला. परंतु नागझिरा अभयारण्य हा साकोली तालुक्याचा एक भाग आहे. नागझिरा अभयारण्यलगत असलेली गावांचा समावे, अतिसंवेदनशिल गावे असा प्रशासनाच्या दप्तरी करण्यात आला आहे. या कारवाईशिवाय साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यात घटनेची नोंद नसली तरी नागझिरा अभयारण्य आणि लगतच्या भागात उन्हाळ्यात तेंदूपत्ता हंगामाच्या वेळी नक्षलवादी येत असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी हिंम्मत जाधव यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता नागझिरा अभयारण्यात नक्षल्यांच्या कुठल्याही हालचाली नसल्याचे स्पष्ट केले.
साकोली-लाखनी तालुक्यात ३३ गावे
साकोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरझरी, चांदोरी, शिवनटोला, पिटेझरी व आतेगाव ही अतिसंवेदनशिल गावे आहेत. सोनेगाव, मक्कीटोला, निप्परटोला, तुडमापुरी, खांबा, जांभळी, मालुटोला, वडेगाव व पळसपाणी ही संवेदनशिल गावे आहेत. केसलवाडा, सालई, पापडा, सिरेगांवटोला, येडगाव व सालेबर्डी ही साधारण गावे आहेत. लाखनी तालुक्यातील ११ गावांचा नक्षलग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता.

साकोली लाखनी, लाखांदूर ही तीन तालुके नक्षलग्रसत घोषित असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता आता मिळणार नाही. यापुर्वी हा भत्ता या कर्मचाऱ्यांना मिळत होता. आता हा भत्ता मिळणार नाही. नक्षलमुक्त झाले असले तरी भविष्यात अशा कारवाया होऊ नये यासाठी पोलिस विभाग सज्ज आहे व या नक्षल कारवाई सुक्ष्म नजर ठेवणे पोलिसांचे काम असून जनतेच्या सुरक्षेचीही काळजी घेऊ, असे उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मत जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version