Home मराठवाडा दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्‍यारी यांनी ४२३२ स्‍नातकांना...

दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्‍यारी यांनी ४२३२ स्‍नातकांना केले विविध पदवीने अनुग्रहीत

0

 

परभणी, दि.२२,(जिमाका) : देशाला स्‍वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत अन्‍नधान्‍याबाबत आयातदार देश होता. कृषि तंत्रज्ञानाच्‍या जोरावर अन्‍नधान्‍यात वाढ करून देशात हरितक्रांती झाली, आज भारत अन्‍नधान्‍यात निर्यातदार देश झाला आहे, सर्व कृषि संशोधनातुन शक्‍य झाले. आज शेजारील देशात अन्‍नाची कमतरता आहे. आत्‍मनिर्भर भारत निर्माण करण्‍यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान दयावे, असे प्रतिपादन राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ प्रसंगी अध्‍यक्षस्‍थानावरून कुलपती श्री. कोश्यारी हे दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे बोलत होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे, उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौर, स्‍वागताध्‍यक्ष कुलगुरू डॉ. अशोक ढवण विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य आमदार डॉ. राहुल पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, राष्‍ट्रीय डांळिब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्‍यपाल मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी पूढे म्‍हणाले की, शेती हेच जीवनाचा आधार असुन अन्‍न हे ब्रम्‍ह आहे. युवकांनी संत महात्‍मांपासुन आदर्श घेऊन समर्पित भावनाने आपल्‍या ज्ञानाचा उपयोग देश व समाज कल्‍याणासाठी करावा. कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे भरीव असे योगदान असुन विद्यापीठातील डिजिटल शेतीवर आधारित प्रकल्‍प अत्‍यंत चांगला उपक्रम आहे.

यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे  म्‍हणाले की, आज वसुंधर दिवस आहे, वसुंधरेचे रक्षण करण्‍याची जबाबदारी सर्वावर आहे. शेती पुढे अनेक समस्‍या असुन कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्‍या माध्‍यमातुन बदलत्‍या हवामानास अनूकूल तंत्रज्ञान व वाणांची निर्मिती करावी. मागील पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात संशोधनाच्‍या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे उन्नत वाण, यंत्रे व औजारे विकसित केले असुन अनेक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिल्‍या आहेत, हे सर्व तंत्रज्ञान शेतकरी बांधवाच्‍या  बांधापर्यंत पोहचले पाहिजे. कृषिच्‍या पदवीधरांनी कोणत्‍याही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्‍याणाकरिता कार्य केले पाहिजे. जागतिकस्‍तरावर डिजिटल शेतीचे वारे वाहत आहे,  देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव व ड्रोन यंत्राचा वापर वाढणार असुन यात मनुष्‍यबळ निर्मितीचे कार्य परभणी कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पात कार्य चालु आहे, आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्‍या शेतक-यापर्यंत पोहचले पाहिजे. शेतकरी बांधवाच्‍या शेतमाल अधिक भाव मिळावा याकरिता महाराष्‍ट्र  शासनाच्‍या कृषि विभागाव्‍दारे  विकेल ते पिकेल उपक्रम राबविण्‍यात येत आहे, शेतकरी बांधवाचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. शेतमालावर कृषि प्रक्रिया करून मुल्‍यवर्धनावर भर दिला जात आहे. महाराष्‍ट्र सरकार २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करित आहे.  शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल आणि महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. कृषी विभागाच्या ५० टक्के योजना महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्‍यात आल्‍या आहेत. महिला बचत गट आणि शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांना बळ देण्‍याचे कार्य शासन करित आहे. आज कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहेत, या पदवीधारक मुलींनीही शेतकरी महिला सक्षमीकरणाकरिता योगदान दयावे, शालेय स्‍तरावर कृषि विषयाचा समावेश करण्‍यात येणार असुन यात कृषि पदवीधर आपले योगदान देऊ शकतील, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

दीक्षांत भाषणात कुलगुरु डॉ. नरेंद्रसिंग राठौड म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने 50 वर्षांचा संस्मरणीय प्रवास पूर्ण केला असुन कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्ताराच्या माध्‍यमातुन कृषि विकासात भरीव असे योगदान दिले आहे. कृषि क्षेत्रातील कुशल मनुष्‍यबळाची मागणी लक्षात घेऊन दर्जेदार शिक्षण देण्‍याची जबाबदारी कृषी विद्यापीठाची आहे. जागतिक स्‍पर्धेत कृषि विद्यापीठे उतरली पाहिजेत शेती पुढे हवामान बदलाचे मोठे आव्‍हान उभे असुन संशोधनाच्‍या माध्‍यमातुन याची दाहकता कमी करता येईल. कृषि विद्यापीठातील संशोधनाची प्राध्‍यान्‍यक्रम ठरवावे लागतील, कृषि शिक्षण आणि उद्योग क्षेत्र संबंध वाढीवर भर दयावा लागेल. जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता, हवामान बदल, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षता, सकल देशांतर्गत उत्पादन वाढ आदींचा विचार करून कृषि अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल. कृषि निविष्‍ठांचा कार्यक्षम वापर करून उत्पादकता आणि नफा वाढवणे हे संशोधनाचे उद्दीष्‍ट असले पाहिजे. डिजीटल तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान सक्षम शिक्षण प्रणालीच्‍या माध्‍यमातुन अध्यापन-अध्‍यायनाची गुणवत्ता सुधारावी लागेल. विद्यार्थ्यांमध्‍ये महाविद्यालयीन अभ्‍यासक्रमातच उद्योजकतेची बीजे रोवली गेली पाहिजे. कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, सेन्सर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आदीचा वापर वाढणार असुन अभ्‍यासक्रमात याचा समावेश करावा लागेल.

स्‍वागतपर भाषणात कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या पन्‍नास वर्षातील कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाचा आढावा मांडला. समारंभात माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी २०२०-२१ वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण ४२३२ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत केले. यात विविध विद्याशाखेतील ३८४२ स्‍नातकांना पदवी, ३५९ स्‍नातकांना पदव्‍युत्‍तर तर ४९ स्‍नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्‍यात आले. दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल यांनी नुतन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उदघाटन केले तसेच माननीय कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांच्‍या शुभ हस्‍ते बायोमिक्‍स निर्मिती केंद्राच्‍या नुतन इमारत तसेच सावित्रीबाई फुले मुलींच्‍या वसतीगृहाचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे आणि डॉ. विणा भालेराव यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

दीक्षांत समारंभात सन २०२०-२१ मधील विद्यापीठ सुवर्ण पदकाचे आणि पारितोषिकांचे मानकरी स्‍नातकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.

यात पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमात विद्यापीठ सुवर्ण पदकाचे मानकरी स्‍नातक केसोजी रावली(कृषि), आदिती बचाटे (अन्‍नतंत्र), श्रध्‍दा पाटील(कृषि अभियांत्रिकी), पुजा सिंगनाळे (गृहविज्ञान), प्रिया भुसारेडी(उद्यानविद्या),शुभम सांळुखे (कृषि जैवतंत्रज्ञान), आकाश देवमारे (एमबीए कृषी)आदींनी गौरविण्‍यात आले तर पदवी अभ्‍यासक्रमातील विद्यापीठ सुवर्ण पदकाचे मानकरी स्‍नातक अंकुश दुर्गा (कृषि), श्रीया लाला (अन्‍नतंत्र), अलंका भोसले (कृषि अभियांत्रिकी), मानसी बाभुळगावकर (सामुदायिक विज्ञान), नुरीन अदिबा (उद्यानविद्या), प्रतिक्षा जाधव (कृषि जैवतंत्रज्ञान), विशाल साळुंखे (एबीएम कृषी) आदींना गौरविण्‍यात आले. दात्‍या कडुन देण्‍यात येणा-या पारितोषिकांचे मानकरी स्‍नातक केसोजू रावली, दिग्विजय धामा, श्रीया लाला, मयंक पांडे, रम्‍याश्री पी एम, शुभम गटकळ, प्रतिक्षा करपे आदींचा गौरव करण्‍यात आला. रोख पुरस्‍काराचे मानकरी स्‍नातक – संजय तोडमल, गोपिका आर, दिग्विजय धामा, प्रितम पाटील, शुभांगी आवटे, नवल मोहंमद चाऊस, वर्षा यंचेवाड, अलंका भोसले आदींना गौरविण्‍यात आले.

वनामकृ विद्यापीठातील विविध इमारतींचे उद्धाटन

राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्‍यारी यांनी दुरदृश्य प्रणाली द्वारे विद्यापीठातील नवीन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उद्धाटन केले. तर

राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे यांनी विद्यपीठातील बायोमिक्स आणि सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह इमारतीचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमास उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य आमदार डॉ. राहुल पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, राष्‍ट्रीय डांळिब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version