Home राजकीय मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन बोललो होतो

मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन बोललो होतो

0

मुंबई : आम्ही विकासाच्या दृष्टीने कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक लढवली होती. याठिकाणी मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असे म्हटले होते. आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो नाही, असे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. तसेच हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. कोल्हापुरातील निवडणुकीत आम्ही विकासाचे मुद्दे मांडले, हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. आम्ही कुठे कमी पडलो याचे चिंतन करण्यात येईल, अशा शब्दात चंदक्रांत पाटील यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.

चंदक्रांत पाटील म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमध्ये ३ पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली. भाजपाने एकट्याने ७७ हजार मते मिळवली. त्यामुळे पराभवाची कारणे शोधण्यात येतील. मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आम्हाला कुठलाही पश्चाताप नाही. प्रत्येक पक्षाचे धोरण वेगवेगळे असते. भाजपाच्या १५ महिला आमदार आहेत. जयश्री जाधव या भाजपाच्या होत्या परंतु काँग्रेस सत्तेत असल्याने त्याठिकाणी जाऊन त्यांनी निवडणूक लढवली. आम्ही सत्तेत असतो तर आमच्या बाजूने त्या लढल्या असत्या, असे ते म्हणाले.

ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्यालाच दगडं मारली जातात. चंद्रकांत पाटील लढले असते तर तुम्हाला कुणाला उभे करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. संघटना उत्तमपणे निवडणूक लढली, असे चंद्रकांत पाटलांनी टिकाकारांना उत्तर देताना सांगितले.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव या १८ हजारांच्या मताधिक्यांने विजयी झाल्या. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याची भाषा केली होती त्याची आठवण लोक करून देतात, मी त्यावर भाष्य करणार नाही, असे विधान पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले होते. तसेच सोशल मीडियावरही चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version