नवी दिल्ली | भारतीय राजकारण सध्या जातीच्या विषयावरून तापताना दिसत आहे. देशातील ब्राह्मण आणि गैर ब्राह्मण वाद हा खूप जुना आहे. पण जेव्हा कधी या वादावर राजकारणी लोक आपली प्रतिक्रिया देतात, तेव्हा यातून एक नवा वाद उभा राहतो. आताही काॅंग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण पेटलेलं आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या वडिलांनी ब्राम्हण हे विदेशी असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना किर्ती आझाद यांनी ब्राह्मण समाज आणि शिवाजी महाराज यांची तुलना केल्यानं देशातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. खासदार किर्ती आझाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण असल्याचं वक्तव्य केलं आहे.
किर्ती आझाद म्हणाले की, देशातील ब्राह्मण समाजाबद्दल नेहमीच चुकीची माहिती पसरवण्यात आली. ब्राह्मण समाजाचा वापर केला गेला. सरकारने आणि नागरिकांनी कधीच ब्राह्मणांना समजून घेतलं नाही. एवढंच नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा ब्राह्मण होते. किर्ती आझाद यांच्या या वक्तव्याचे परिणाम वाईट होण्याची चिन्ह आहेत.
आपल्या पक्षातील खासदाराने हे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काॅंग्रेस पक्ष काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरभंगा या क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करणारे आझाद हे माजी क्रिकेटपटू आहेत. सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी आझाद हे चर्चेत असतात. दरम्यान आता आझाद यांनी शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलल्यानं हा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.