अधिवेशनात अवकाळीवरुन विरोधकांनी सरकारला घेरले, मात्र कृषिमंत्र्यांचा पत्ताच नाही

0
24

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी कृषिमंत्री दादा भूसेदेखील सभागृहात विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व गदारोळात विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा अवकाळीबाबतचा एक शब्दही अद्याप ऐकू आलेला नाही.

विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत. पहिल्या दिवसापासून अवकाळीच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. अशात कृषिमंत्री अब्दुल सत्तार नेमके आहेत तरी कुठे?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

राज्यात अवकाळी, कृषिमंत्री मात्र दिसेनात

खरे पाहता कृषिमंत्री या नात्याने अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना किंवा पत्रकारांसमोर आपली बाजू मांडणे अपेक्षित होते. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सरकार काय मदत करणार? कोणती पावले उचलणार? किंवा अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीचे किती नुकसान झाले आहे? यावर सरकार काय उपाययोजना करत आहे, याची माहिती कृषिमंत्र्यांनी देणे, अपेक्षित होते. मात्र, अधिवेशन सुरू असूनही व राज्यात अवकाळीने कहर केलेला असतानाही कृषिमंत्रीच दिसेनासे झाले आहेत.

माजी कृषिमंत्री दादा भुसे आले पुढे

केवळ अवकाळी पाऊसच नव्हे तर नाफेडच्या कांदा, हरभरा खरेदीवरुनही विरोधक गेल्या तीन दिवसांपासून सरकारवर हल्ला चढवत आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात किती हेक्टरचे नुकसान झाले, याची माहिती दिली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनाम्याचे तातडीने आदेश दिले असून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, अशी ग्वाही दिली. यावर नाफेडने अजून अनेक ठिकाणी कांदा खरेदी सुरू केलीच नाही. मुख्यमंत्र्यांचा दावा चुकीचा आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.

विशेष म्हणजे यावर विद्यमान बंदरे व खनिज मंत्री व राज्याचे माजी कृषिमंत्री दादा भूसे यांनी उभे राहत अजित पवारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे म्हणाले, नाशिकमध्ये नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. नाफेडने नेमका किती कांदा खरेदी केला, याबाबत माहिती मिळवून सभागृहाला सांगेल, अशी समजूत घालण्याचा प्रयत्न दादा भुसे यांनी केला. मात्र, यावर अजित पवारांचे समाधान झाले नाही व त्यांनी विधानसभेत सभात्याग केला. माजी कृषिमंत्री दादा भुसेदेखील सरकारच्या बचावासाठी पुढे येत असताना विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची अनुपस्थिती चांगलीच खटकली.

घोषणा देवेंद्र फडणवीसच करणार?

दरम्यान, कांद्याला हमीभाव मिळत नसल्याबद्दल काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तारांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली होती. यावेळी आपण शेतकऱ्यांना मोठी मदत करणार आहोत, मात्र घोषणा कोणतीच करणार नाही, असा सावध पवित्रा अब्दुल सत्तारांनी घेतला होता. यापूर्वी परस्पर घोषणा करण्यावरून सत्तारांना देवेंद्र फडणवीसांनी फटकारल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे आता कोणतीही घोषणा करण्यापूर्वी सत्तार यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे