नवी दिल्ली-गेल्या दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे.
देशाला निकालाची प्रतीक्षा
सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. या निकालासाठी महाराष्ट्राची जनता आणि सर्वच राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. उद्या जर या प्रकरणी फैसला झाला तर कुणाच्या पारड्यात निकाल जाईल हे लवकरच समजणार आहे.
संध्याकाळी स्पष्ट होईल
दोन महत्वाचे निकाल उद्या लागणार आहे असे सांगण्यात आले आहे तसे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे लिस्टींग होईल. त्यातून उद्या नेमके कोणते प्रकरण कोर्ट हाताळेल हे आज सायंकाळी स्पष्ट होईल.
आत्ताच निकाल का?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू आहेत. त्यात स्वतः सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यामूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. यातल्या न्यायमूर्ती एम. आर. शहा हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे तत्पूर्वी हा निकाल येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, 20 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्याही सुरू होत आहेत. 20 मे ते 2 जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे हा निकाल उद्या येण्याची शक्यताय.
राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना
शिंदेंच्या शिवसेनेचे खासगार राहुल शेवाळे हे दिल्लीला तातडीने रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे व शिंदे गटाचे नेते दक्ष झाले असून दिल्लीकडे ते प्रयाण करीत आहेत.
या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
- एकनाथ शिंदे
- संदीपान भुमरे
- अब्दुल सत्तार
- तानाजी सावंत
- संजय शिरसाट
- यामिनी जाधव
- चिमणराव पाटील
- भरत गोगावले
- लता सोनावणे
- रमेश बोरणारे
- प्रकाश सुर्वे
- बालाजी किणीकर
- महेश शिंदे
- अनिल बाबर
- संजय रायमुलकर
- बालाजी कल्याणकर
-
अपात्र ठरवले तर…
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 16 आमदारांना अपात्र ठरवले, तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. नवे सरकार स्थापन करावे लागेल. मात्र, आमदार अपात्रतेचा निर्णय जर विद्यमान विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत शिंदे-फडणवीस जैसे थे परिस्थिती ठेवू शकतात. या साऱ्या पार्श्वभूमीवरच केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू आणि राहुल नार्वेकर यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्या भेटीचीही चांगलीच चर्चा रंगली होती.