नवी दिल्ली:- ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे, देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांचा समावेश होतो.समाजाच्या जनहितासाठी काम करणाऱ्या नायक आणि वीरांना देशाच्या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ज्यामध्ये साहित्यिक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे चैत्राम पवा तसेच प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी ३० नावांची घोषणा केली आहे. भीमसिंग भावेश, डॉ.नीरजा भाटला, ॲथलीट हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर होमिओपॅथी चिकिस्तक असलेल्या डॉ. विलास डांगरे आणि वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, मध्य प्रदेशातील उद्योजिका शैली होळकर, मराठी लेखक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना पद्मश्री देण्यात येणार आहे. दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला, सामाजिक कार्यकर्ते भीमसिंह भावेश, पुद्दुचेरी येथील थविल वादक पी. दत्चनमूर्ती, पश्चिम बंगालमधील धक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योग शिक्षिका शेखा एजे अल सबा, उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यूग आणि कॉलीन गँटझर, नागालँडमधील फळ उत्पादक एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, कादंबरीकार जगदीश जोशीला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विलास डांगरे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. संपूर्ण विदर्भात त्यांची वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख आहे. गेल्या ५० वर्षांपासून ते वैद्यकीय सेवा देत आहेत. मागास, गरीब रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी अनेक डॉक्टरांना प्रशिक्षित करत एक नवी पिढी घडवली. विशेष म्हणजे स्वत:ला दृष्टीदोष उद्भवलेला असतानाही त्यांचं वैद्यकीय कार्य सेवा थांबलं नाही. त्यांची सेवा अखंड आणि अविरतपणे सुरु होती. गेल्या ५० वर्षांत त्यांनी १ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.
वनं आणि वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या चैत्राम देवचंद पवार यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. ४०० हून अधिक हेक्टर वनक्षेत्र वाढवण्याच्या कार्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी ५ हजारांहून अधिक झाडं लावली. ४५८ लहान तळी आणि ४० मोठी तळी त्यांनी बांधली. त्यांच्या या कामामुळे त्या भागांमधील भूजल पातळी वाढली. धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या ८ आणि ४८ पक्षांच्या प्रजातींचं संवर्धन करण्याचं काम त्यांनी केलं. झाडांच्या, रोपांच्या प्रजातींचं संवर्धन करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.
ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. पर्यावरणाशी संबंधित लेखन करणारे साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पर्यावरण विषयक २० हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्राणी, पक्ष्यांची डिक्शनरी लिहिली आहे. त्यासोबतच त्यांनी वनाधिकारी म्हणूनही काम केलं आहे. निसर्ग, पर्यावरणाशी नाळ जोडलेला साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानं अतिव आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुरस्कार जाहीर झाल्याचं समजताच मी निशब्द झालो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी:-
एल हँगथिंग (नागालँड)
हरिमन शर्मा (हिमाचल प्रदेश)
जुमदे योमगम गमलिन (अरुणाचल प्रदेश)
जोयनाचरण बाथरी (आसाम)
नरेन गुरुंग (सिक्कीम)
डॉ. विलास डांगरे (महाराष्ट्र)
शेखा एजे अल सबाह (कुवैत)
निर्मला देवी (बिहार)
भीमसिंग भावेश (बिहार)
राधा बहिन भट्ट (उत्तराखंड)
सुरेश सोनी (गुजरात)
पंडीराम मांडवी (छत्तीसगड)
जोनास मॅसेट (ब्राझील)
जगदीश जोशीला (मध्य प्रदेश)
हरविंदर सिंग (हरियाणा)
भैरूसिंग चौहान (मध्य प्रदेश)
व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर (कर्नाटक)
पी दत्तनमूर्ती (पुडुचेरी)
लिबिया लोबो सरदेसाई (गोवा)
गोकुल चंद्र दास (पश्चिम बंगाल)
ह्यू गँट्झर (उत्तराखंड)
कॉलीन गँटझर (उत्तराखंड)
डॉ. नीरजा भाटला (दिल्ली)
सायली होळकर (मध्य प्रदेश)
मारुती भुजंगराव चितमपल्ली (महाराष्ट्र)
️️परदेशी नागरिकांचाही सन्मान
शेखा एजे अल सबा:-
कुवेतच्या योगसाधक अल सबा यांना योग चिकित्सामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी त्यांच्या देशातील पहिला परवानाधारक योग स्टुडिओ स्थापन केला. याद्वारे अल सबाहने आखाती देशांमध्ये आधुनिक पद्धतींसह योगास प्रोत्साहन दिले आणि शम्स यूथ योगाची सह-स्थापना केली.
जोनास मॅसेट:-
ब्राझिलियन मेकॅनिकल अभियंता हिंदू आध्यात्मिक नेता बनलेले जोनास यांनी भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार केला. जागतिक स्तरावर वेदांत ज्ञानाचे शिक्षणही त्यांनी सोपे केले. २०१४ मध्ये त्यांनी विश्वविद्येची स्थापना केली. त्याचे कार्यालय रिओ दि जानेरो येथे आहे.