गडचिरोली : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद झाले आहे. २ जवान जखमी असल्याचीही माहिती आहे. ही चकमक गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली. परिसरात शोध मोहीम सुरु असून मृतांची संख्या वाढू शकते.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडका जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे दोन दलम लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबविली होती. दरम्यान, लपून असलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जावनांनीही प्रत्युत्तर दिले. यात ३१ नक्षलवादी ठार झाले. तर २ जवान शहीद व २ जवान गंभीर जखमी झाले आहेत.
मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतररित होत आहेत. तसेच बॉर्डरवर अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बिजापूर जिल्ह्यात ही कारवाई केली.ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. तीन जिल्ह्यांतील सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी शस्त्रेही जप्त केली आहेत.