घरकुलांसाठी आवश्यक निधीबाबत तात्काळ माहिती सादर करा; शासनाकडे पाठपुरावा करू – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0
18

अमरावती, दि. २८ : जिल्ह्यातील सर्व शहरांत गरजूंना घरे मिळण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करतानाच आवास योजनेत घरकुल निर्मितीसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तात्काळ द्यावेत. निधीअभावी ही कामे थांबता कामा नयेत. आपण स्वतः याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

नगरविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, नगरविकास प्रशासन अधिकारी गीता वंजारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध शहरांत आवास योजनेत शासकीय जमीनीवरील 2 हजार 555 अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. नगरपंचायतींच्या क्षेत्रातही हे काम पूर्ण व्हावे. आवास योजनेची कामे पूर्ण होण्यासाठी वेळेत प्रस्ताव, निधीसाठी पाठपुरावा नियमित होणे गरजेचे आहे. याबाबत सर्व नगरपालिका व नगरपंचायतींची बैठक मुंबईत मंत्रालय स्तरावर घेतली जाईल.

त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हास्तर नगरोत्थान योजनेत नगरपरिषदांनी वेळेत प्रस्ताव द्यावेत. अग्निशमन बळकटीकरणात अपेक्षित कामे गतीने पूर्ण करावीत. पर्यटन अनुदान, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी बाबींचाही आढावा त्यांनी घेतला.डेंग्यू नियंत्रणासाठी सर्व शहरांत धूर फवारणी, घरोघरी सर्वेक्षण आदी उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.