Home विदर्भ चंद्रपूर येथे संविधान भवन निर्माण करणार – बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर येथे संविधान भवन निर्माण करणार – बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार

0

चंद्रपूर, दि. 14 एप्रिल : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला बहुमूल्य संविधान दिले आहे. समाजातील शेवटच्या घटकाला उभे करण्याची शक्ती संविधानात आहे. 1956 मध्ये नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपुरात दीक्षा दिली. त्यामुळे येथील दीक्षाभूमीच्या विकासासोबतच चंद्रपुरात संविधान भवन निर्माण केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, प्रकाश देवतळे, सुनिता लोढिया, नंदू नगरकर आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर प्रथमच डॉ. बाबासाहेबांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या आनंदाने साजरी होत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, संविधान भवनाचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाने त्वरीत पाठवावा. जमीन उपलब्धतेसोबतच टप्प्याटप्प्याने यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी 20 कोटी रुपयांचे नियोजन, सिंदेवाही येथील दीक्षाभूमीसाठी एक कोटी आणि ब्रम्हपूरी येथील दीक्षाभूमीसाठी सव्वा कोटी रुपयांची तरतुद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळ येथे विपश्यना केंद्र निर्मितीसाठी 45 कोटी मंजूर झाले आहेत. यातील पहिला टप्पा 15 कोटींचा आहे.

पुढे ते म्हणाले, बाबासाहेबांचे नाव, विचार आणि त्यांनी दिलेले संविधान नागरिकांनी कायम आपल्या मनात कोरून ठेवले पाहिजे. देशाची लोकशाही संविधानानुसार चालते. धर्म माणसाला जोडणारे असावे. कोणत्याही धर्माच्या ग्रंथाला मानत असाल तर माना, मात्र संविधान हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, याची जाणीव ठेवा. संविधानाने समाजातील प्रत्येक व्यक्ती, धर्माला न्याय देण्याचे काम केले आहे. शोषित, वंचित, पिडीत यांना न्याय देऊन येथील विषमता नष्ट करण्याचे महान कार्य डॉ. आंबेडकरांनी केले आहे. ज्ञानाचा उगम बाबासाहेबांपासून झाला, याची नागरिकांनी जाणीव ठेवावी. बाबासाहेब हे सर्व धर्मियांचे होते. हिंदू कोड बिल आणून महिलांना बाबासाहेबांनी सन्मान मिळवून दिला. संत कबीर, संत तुकाराम आणि महात्मा ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचे तीन गुरु होते. तसेच तथागत गौतम बुध्दांच्या विचारांचा त्यांनी स्वीकार करून बौध्द धर्माची दीक्षा घेतली. तथागतांच्या विचारातच जगाचे कल्याण आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. जोरगेवार म्हणाले, सामाजिक न्याय विभाग अतिशय महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळाला पाहिजे. समाजकल्याण विभागाचा कोणताही निधी शिल्लक राहता कामा नये. तर प्रभारी जिल्हाधिकारी श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, डॉ. आंबेडकरांची महिमा शब्दात सांगता येत नाही. तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य झिजविले. आंबेडकरांच्या ज्ञानार्जनाच्या मार्गाचा सर्वांनी अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

भर उन्हात रस्त्यावर विक्री करणा-या फुटपाथवाल्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे, या हेतुने डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यात संजय फुरसंगे, अमीर शेख, सलिल शेख, मालता निमसरकार अशा 10 जणांचा समावेश होता.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version