शहरवासियांनो तुम्हाला संशयास्पद वाटतेय मग…करा 112 डायल

0
40

पोलीस अधीक्षकांचे आव्हान : पाच मिनिटात चार्ली पथक पोहोचणार

गोंदिया,दि.27 : सर्वसामान्य नागरिकांना शहरातील कुठल्याही भागात काही संशयास्पद वस्तु आढळल्यास किंवा संशयीत व्यक्ती वाटत असल्यास कायदा सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्यासाठी शहरवासियांनी 112 क्रमांकावर डायल करुन बिनधास्त माहीती द्यावे असे आवाहन पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी आज(दि.27)केले.

तसेही नागरिकांच्या अडीअडचणीच्यावेळी मदतीसाठी गोंदिया पोलीस नेहमीच धावून जाते.मात्र शहरातील वाहतुकीची व रस्त्यांची अडचण लक्षात घेत घटनास्थळावर लवकरात लवकर पोचता यावे यासाठी मोटारसायकल गोंदिया शहर पोलीस ठाण्याला मिळाल्या आहेत.या वाकीटाॅकीसह सुसज्ज असलेल्या मोटारसायकल पथकाला पोलीस अधिक्षक निखील पिंगळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजणे,गोंदिया शहर पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी,गोंदिया ग्रामीण पोलीस निरिक्षक सचिन म्हेत्रे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी  डायल 112 या योजनेला पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर 27 फेब्रुवारीपासून केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरात कुठेही संशायास्पद आढळले तर त्वरित 112 डायल करा, हे चार्ली पथक पाच मिनिटात त्या ठिकाणी पोहोचणार, असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले. शहराकरीता 6 पथक तयार करण्यात आले असून महिलांचेही एक पथक यात आहे. या सेवेकरिता 35 पुरुष व महिला पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.शहरात दुचाकी वाहनावर दोन अंमलदार 24 तास सेवा देणार आहेत. हे पथक 24 तास कर्तव्यावर राहणार असून या पथकातून कुणाला काढायचे असेल किंवा नव्या अंमलदाराची नियुक्ती करायची असेल तर त्याचे सर्वाधिकार हे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

नागरिकांना एकाचवेळी सर्व प्रकारची मदत मिळावी.या उद्देशाने 112 या डायल ही योजना सुरु करण्यात आली.काही दिवसापूर्वी एका युवकाला देशी कट्ट्यासह अटक करण्यात आली. त्याचा काही घातपात करण्याचा उद्देश असल्याचे समजून येत आहे. शहरात अशात अनेक घटना घडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे डायल 112 ही योजना सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी शहरात कुणीही चाकू, बंदूक, तलवार धरून फिरताना आढळला तर त्वरित 112 या क्रमांकावर संपर्क करावे. नागरिकांनी 112 या क्रमांकावर फोन लावल्यास पोलीस अंमलदार 5 मिनिटात त्या ठिकाणी पोहचणार,याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे व कुठेही संशयास्पद आढळले तर 112 हा क्रमांक डायल करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.