शेतकऱ्यांच्या दर्जेदार उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार- पंकज रहांगडाले

0
19

गोंदिया, दि.23 : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू गुणवत्तापूर्वक व दर्जेदार असतात. त्यामुळे स्वयंसहायता महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणार. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले.

         कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदान, बालाघाट रोड, गोंदिया येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे हे होते. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी (माविम) नागपूर राजु इंगळे, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, कृषी विज्ञान केंद्र हिवरा चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सैय्यद अली, कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण, तंत्र अधिकारी कावेरी साळे, पं.स.सभापती मुनेश्वर रहांगडाले यांचेसह सर्व जि.प.सदस्य व सर्व पं.स.सदस्य मंचावर उपस्थित होते.

         कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे कृषी महोत्सवाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जे विकेल ते पिकेल अशा पिकाचे उत्पादन घ्यावे. महिला आता आत्मनिर्भर झालेल्या आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना विक्री करण्यासाठी पंचायत समितीमध्ये 2 दुकाने उपलब्ध करुन देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

        गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी हा धानाची शेती करीत असला तरी स्ट्रॉबेरी सारखे नवनविन उत्पादन घेत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे सेंद्रीय गुळाची निर्मीती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेती करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला नेहमीच सहकार्य राहील असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाविण्यपूर्ण प्रकल्प उभारावे जेणेकरुन प्रशासकीय मदत करण्यास सोईचे होईल. या कृषी महोत्सवाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.

        जिल्ह्यातील अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात व सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक क्षेत्रात जिल्ह्याची ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक हे तांदूळ आहे. भविष्यात अनेक फलोत्पादन घेऊन जिल्ह्यात प्रगती घडून येईल असे मुनेश्वर रहांगडाले यांनी सांगितले.

       महिला आर्थिक विकास महामंडळ राज्यात चांगले कार्य करीत आहे. राज्यात सव्वा लाख महिला बचत आहेत. महिला ह्या बँकेच्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करतात, त्यामुळे महिला बचतगट लिंकेजचे प्रमाण वाढले आहे. महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तुंना मार्केटींग मिळाली तर महिलांचा आर्थिकस्तर उंचावेल व त्या आत्मनिर्भर होतील. विकेल ते पिकेल असा शासनाचा मानस आहे. महिला बचतगटानी तयार केलेल्या वस्तु गुणवत्तापूर्वक असल्यामुळे या कृषी महोत्सवात सहभागी होऊन वस्तु विकत घ्यावे असे आवाहन राजु इंगळे यांनी केले.

       यावर्षी 2 हजार 500 महिला बचतगटांना 80 कोटी रुपये कर्ज देण्यात आले. 310 महिलांना 3 कोटी रुपये वैयक्तिक कर्ज दिले. संयुक्त दायित्व गट (यामध्ये प्रत्येक गटात 5 महिला असतात) यामधून 8 कोटी रुपये कर्ज देण्यात आले असे संजय संगेकर यांनी सांगितले.

        या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शनी, धान्य महोत्सव, उत्पादक ते थेट ग्राहक थेट विक्री, चर्चासत्र व परिसंवाद, पौष्टिक तृणधान्य महोत्सव, पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा, खाद्य महोत्सव, खरेदीदार विक्रेता संमेलन, सेंद्रीय शेतमाल विक्री, शेतकरी सन्मान समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमक, विविध शासकीय योजनांवर मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे असे प्रास्ताविकातून हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.

      यावेळी जयश्री पुंडकर, छाया मेश्राम, डॉ.मंगला कटरे, सविता तुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

      याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

      प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,  पंजाबराव देशमुख व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

      या कृषी महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळाचे 70 स्टॉल, कृषी विभाग व संलग्न 30 स्टॉल, कृषी यांत्रिकीकरण 20 व इतर 30 स्टॉल, असे एकूण 150 स्टॉल्स लावलेले आहेत.

      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले. उपस्थितांचे आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.