Home विदर्भ पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा संपन्न

पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा संपन्न

0

 गोंदिया, दि.25 : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया यांचे वतीने जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचे आयोजन 24 मार्च रोजी मोदी मैदान, टी पॉईंट जवळ, बालाघाट रोड, गोंदिया येथे करण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्यात पारंपारिक भात पिकाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई इत्यादी पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र वाढावे या दृष्टिकोनातून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

        सदर कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले. यावेळी कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र हिवराचे वरिष्ठ संशोधक डॉ. सय्यद शाकीर अली, सहयोग रुग्णालय गोंदिया आहारतज्ञ डॉ. प्राजक्ता डोंगरवार, एस.एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया प्राध्यापक डॉ. ईश्वरी खटवानी उपस्थित होते.

        यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीबाबत विस्तृत माहिती दिली.

       कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023 साजरा करण्यामागे काय उद्दिष्टे आहेत व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची रूपरेषा काय आहे याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

       डॉ. सय्यद शाकीर अली यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भात पिकाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी कसे फायदेशीर आहे व त्यांचे लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमाला उपस्थित आहार तज्ञ डॉ. प्राजक्ता डोंगरवार यांनी उपस्थित महिला व पुरुष शेतकऱ्यांना दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे का गरजेचे आहे व मानवी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई यांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

       प्राध्यापक डॉ. ईश्वरी खटवानी यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो, कुटकी इत्यादी धान्यांपासून चविष्ट व सकस पदार्थ कसे तयार करावेत याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमाला जिल्ह्यातील पुरुष व महिला शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी गोंदिया पवन मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी सालेकसा नंदू वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सल्लागार भारत गोंडाने, नूतन कटरे, रिजवान शेख, अनिता उके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version