यवतमाळ : ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी जिल्ह्यातील बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत मुक्काम केला. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोई-सुविधांची पाहणी केली. आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
आश्रमशाळेत आगमण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना त्यांनी आश्रमशाळा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण बनविण्यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा आश्रमशाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांला आश्रमशाळेत टाकताना येथे उत्तम दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध होते, अशी भावना पालकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आश्रमशाळांचे अधिक्षक, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न व अध्यापन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्याचा आदिवासी विभाग नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देणारा विभाग बनवू, असे प्रा.डॉ.उईके यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मंत्री डॉ.उईके यांनी रात्री वसतिगृहातील स्वयंपाकघर, धान्यसाठा गृह, विद्यार्थी व विद्यार्थीनींची निवास व्यवस्थेची पाहणी केली. आश्रमशाळेत तयार झालेले भोजन विद्यार्थ्यांसह पंगतीत बसून घेतले. विद्यार्थ्यांनी यावेळी गोंधळ, कोलामी नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या सादरीकरणाचे मंत्री डॉ. उईके यांनी कौतूक केले. यावेळी मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून भोजनाचाही आस्वाद घेतला. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रकल्प अधिकारी अमीत रंजन, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, बोटोणीच्या सरपंच सुनिता जुमनाके, उपसरपंच प्रविण वनकर व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.