चंद्रपूर- जिल्ह्यातील जमनजेट्टी येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीला आळा घालावा आणि तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी, चंद्रपूरच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
अवैध रेती उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तसेच शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुली तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तस्करी निर्भयपणे सुरूच आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी यांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने आम आदमी पार्टीने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.
गँगवारला मिळतंय खतपाणी!
जिल्ह्यात अवैध धंद्यांमधून गँगवार उदयास येत असून अधिकारी व तक्रारदारांवर भविष्यात हल्ले होऊ शकतात. त्यामुळे अवैध धंद्यांचे प्रमुख सूत्रधार आणि त्याचा आका यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, असा स्पष्ट इशारा आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे दिला आहे.
जमनजेट्टी परिसरात अवैध रेती तस्करी सुरू असून तो परिसर सिटी पोलीस स्टेशनपासून अवघ्या २ किमी अंतरावर आहे. एवढ्या जवळ असतानाही ही अवैध वाहतूक कशी सुरू आहे? असा सखोल प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे.
यावेळेस आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर महिला अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.