
मुंबई,-नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सध्या हे पद रिक्त आहे. या पदासाठी निवडणूक कधी घेणार, अशा आशयाचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला लिहिले आहे. काही दिवसातच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाअगोदर विधानसभा अध्यक्ष निवडण्यात यावा, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रा संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा देखील झाली.
महाविकास आघाडीकडून घेतलेल्या निर्णयांवर राज्यपाल आडमुठी भूमिका घेत आहे. त्यामुळे अनेक निर्णय खोळंबून बसले आहेत. विशेष करून 12 आमदारांच्या पत्रावर अजूनही राज्यपालांनी सही केलेले नाही. राज्यपालांकडून वेळोवेळी घटनात्मक पदाची आब राखली जात नसून, संविधानाची देखील पायमल्ली होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे. म्हणूनच राज्यपालां विरोधात महाविकास आघाडी कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली.
अध्यक्ष निवडणुकी संदर्भात काय हालचाली करायच्या यावर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची चर्चा झाली. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना बारा राज्यपाल नियुक्त आमदारांचे पत्र देण्यात आले आहे. त्या पत्रावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही. असे असताना राज्यपालांनी राज्य सरकारला पत्र पाठवल्याने आता पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल असा वाद निर्माण होईल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.





