
मुंबई, दि.२3: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्राने देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे. योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचा देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यात योजनेंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचा गौरव होणार आहे त्याबद्दल कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विभागाचे कौतुक केले आहे.
शेतकरी सन्मान योजनेस २ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे राज्य व निवडक जिल्ह्यांचा सत्कार दि. २४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
या योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत १.१४ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत साधारण १.०५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ११,६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.
या योजने अंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी ५ टक्के लाभार्थींची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्रास ४ लाख ६८ हजार ७४७ शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गावनिहाय यादी प्राप्त झाली होती. त्यातील ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांकाचे काम केले आहे.
राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास ३८ हजार ९९१ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यापैकी २३ हजार ६३२ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याने राज्यास देशपातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
पुणे जिल्ह्याने प्राप्त २२७८ तक्रारींपैकी २०६२ तक्रारींचा निपटारा करून आणि अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत २८ हजार ८०२ लाभार्थ्यांची १०० टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय काम केले. त्याबद्दल पुणे व अहमदनगर जिल्ह्यास पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.