
कोलकाता | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकींचं वातावरण तापलेलं असतानाच आता एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. तृणमूल काँग्रसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या गाडीच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या हल्ल्यात बॅनर्जी यांच्या डाव्या पायाला जखम झाली असल्याचीही माहिती आहे. या घटनेनं नंदीग्राम परिसरातील वातावरण काही काळ तंग असल्याचं पहायला मिळालं.
प्राप्त माहितीनुसार, ममता बॅनर्जी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी नंदीग्राममध्ये दाखल झाल्या होत्या. काही स्थानिक व्यक्तींच्या गाठीभेटी घेत असताना कोणतंही पोलिस संरक्षण यावेळेस त्यांना देण्यात आलं नव्हतं. मंदिरातील पुजा उरकून त्या गाडीत बसण्यासाठी जात असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी जोरात दरवाजा ढकलून ममता यांना गंभीर दुखापत घडवून आणली.
कोणताही स्थानिक पोलिस अधिकारी यावेळेस संरक्षणासाठी उपस्थित नव्हता. हे जाणूनबुजून करण्यात आलेलं असून या हल्ल्यामुळं आपल्या छातीत दुखत असल्याचंही ममता यांनी स्पष्ट केलं आहे. हल्ल्यानंतर ममता यांना तातडीनं कोलकत्यात उपचारासाठी आणलं जात असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.
दरम्यान भाजपकडून मात्र घडलेल्या घटनेबाबत ममतांवर निशाणा साधण्यात आला आहे. ममता खोट बोलण्यात पटाईत असून आगामी निवडणूकीत आपण पराभूत होणार असल्याचं माहित असल्यानं सहानूभूती मिळवण्यासाठी स्टंट करत आहेत, असा आरोप भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे.





