नवी दिल्ली,दि.26 : बौद्ध धम्मातील आणि आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीसाठी केंद्र शासनाने 17 कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली.
येथील महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी नागपुरातील दीक्षाभूमीसाठी 17 कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती दिली. यापैकी 4 कोटी रूपयांचा धनादेश नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित 13 कोटी रूपये टप्प्या-टप्प्याने पाठविले जातील, अशी माहिती आठवले यांनी या वेळी दिली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लाखो अनुयायांसह बुध्द धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली होती. या ऐतिहासिक घटनेनंतर या जागेला दीक्षाभूमी हे नाव प्राप्त झाले. दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोक या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन वर्धापनदिनानिमित्त एकत्र येतात. त्यासाठी शासन स्तरावर विविध सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे आठवले म्हणाले.