
मुंबई,दि.19- महाराष्ट्रात करोनाचा ग्राफ सतत वाढताना दिसत असून करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही.
महाराष्ट्रात करोना संसर्गाचा कहर आणखी वाढला असून रविवारी ६८ हजार ६३१ नवीन करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. कर, राज्यात काल ५०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही एका दिवसातील राज्यातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात दर तीन मिनिटाला एका रुग्णाचा करोनामुळं मृत्यू होत असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
करोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कलम १४४ लागू केलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने काही निर्बंध अधिक कठोर केले आहेत. तसंच, विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तरीही करोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. मुंबईतही करोनाचा कहर वाढत चालला आहे.
दर एका तासाला २ हजारांहून अधिक बाधित
महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती दिवसेंंदिवस चिंताजनक होत चालली आहे. दर ३ मिनिटाला एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर, एका तासात दोन हजारांहून अधिक जणांना करोनाची लागण होत आहे.
करोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेत ग्रोथ रेटही वाढत आहे. मुंबईत करोनाचा ग्रोथ रेट वाढून १. ५३ टक्के इतका झाला आहे. ग्रोथ रेट वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कलावधी व मृत्यू दरात काही प्रमाणात दिलासा मिळतोय.




