
ऊस लावण्याचे गडकरी यांचे आवाहन
भंडारा : धानाला पर्याय म्हणून उसाकडे बघा. पुढील दोन वर्षात तीनशे कोटींची गुंतवणूक करून कारखान्याचा विस्तार करीत क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करावी व त्यासाठी संचालकांनी त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देव्हाडा येथे केले.
नितीन गडकरी यांनी देव्हाडा येथील मानस युनिट 4 या साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. परिसरात फिरून पाहणी केल्यानंतर त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान गडकरी यांनी प्रत्येकाने शेतकऱ्यांना अधिकाधिक ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले. या कारखान्याच्या माध्यमातून भविष्यात अनेक प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प कारखाना परिसरात लवकरच सुरू होईल. कारखान्याचे विस्तारीकरण करून पुढील दोन वर्षात त्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. प्रकल्पाची व्याप्ती वाढल्यास त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होईल. निर्मिती सोबतच ऊस उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी शेतकऱ्यांच्या घरात येणार आहे. त्यामुळे धानासोबतच पर्यायी पीक म्हणून उसाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.
एकरी 103 टन ऊस घेणारे शेतकरी आहेत. आज हे शेतकरी लाखोच्या घरात नफा मिळवीत आहेत. त्यामुळे ऊसाच्या शेतीकडे वळण्याचा सल्ला त्यांनी दिला. भविष्यात भंडारा जिल्ह्यात धानापासून इथेनॉल तसेच तणसा पासून सीएनजी निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येईल. या इंधनावर ट्रॅक्टर चालणार असून यातही शेतकऱ्यांची होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खा.सुनील मेंढे यांनी नितीनजी यांनी भंगारात निघालेला साखर कारखाना विकत घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या खंबीर आराधाबद्दल त्यांचे आभार मानले. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाकडे अधिकाधिक वळावे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी सारंगजी गडकरी, समयजी बनसोड, आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाध्यक्ष भाजप गोंदिया केशवराव मानकर, माजी खा.शिशुपाल पटले, तारिक कुरेशी, माजी आ.चरण वाघमारे, बाळा कशिवार, मानसचे उपाध्यक्ष भोजराम कापगते, ओम कटरे, वसंता इंचिलवार व सर्व संचालक उपस्थित होते.





