
मुंबई–मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानी नामफलकावरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला आहे. विमानतळावरील या नामफलकाला विरोध करत त्याची तोडफोड करण्यात आली आहे. अदानी समुहाने गेल्या काही दिवसापूर्वी या विमानतळाचा ताबा घेतला आहे. त्यांनी मुख्य प्रवेशव्दारावर ‘अदानी एअरपोर्ट’ असे नामफलक लावले आहे.
शिवसेनेचा या नामफलकाला विरोध असून या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना हे फलक का लावले? अशी विचारणा शिवसैनिकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावरील या नामफलकाची तोडफोड केली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

विमानतळाचा सध्या अदानी समुहाकडे ताबा
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा 13 जुलै रोजी अदानी समुहाकडे आला आहे. यापूर्वी हा ताबा जीव्हीके कंपनीकडे होता. अदानी समुहाकडे हा ताबा येताच त्यांनी विमानतळावरील दोन्ही ठिकाणी हे फलक लावले आहे. या नामफलकावर शिवसेनेकडून वारंवार तक्रार करण्यात येत होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर काही दिवसापूर्वी टिप्पणी केली होती.
काय म्हणाले अदानी समुह?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यासोबतच या नावाच्या ब्रॅन्डिंगमध्येदेखील कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे अदानी समुहाने म्हटले आहे. यासाठी मार्गदर्शक तत्त्वांच पालन केले जाणार असून सर्व गोष्टी भारतीय विमान प्राधिकरणाच्या निकषानुसारच होत आहे. आधी जिथे ज्या कंपनीचे नाव होते त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट असे ब्रॅन्डिंग करत असल्याचे समुहाने स्पष्ट केले आहे.
शिवसेनेची मागणी काय?
शिवसेनेचा या नामफलकाला विरोध असून या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना हे फलक का लावले? अशी विचारणा शिवसैनिकांकडून केली जात आहे. आधी देखील जीकेव्ही कंपनीकडे हा ताबा असताना त्यांनी कधी नावात बदल केले नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावरील या नामफलकाची तोडफोड केली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.





