
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विनम्र अभिवादन
मुंबई, दि.६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनध्यास होता. त्यासाठीच त्यांनी ज्ञानसाधना केली. समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी आपल्या विद्वत्तेचा विनियोग केला. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेले अमूल्य योगदान हे एक कारण आहे. यातून एक सशक्त असे प्रजासत्ताक राष्ट्र उभे राहू शकले. डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपण सर्व कृतज्ञ राहूया आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी कटीबद्ध होऊया. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
कोरोना प्रकोप आणि संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. गर्दी टाळावी, आरोग्य नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे
मुंबई, दि. ६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा अनेकांनी आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.





