
चंद्रपूर- तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबीयांवर काळानं घाला घातला आहे. चंद्रपूर जवळील पिंपळनेरी-खापरी मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले. कार अनियंत्रित झाल्याने अपघात घडला. यात घटनास्थळी मायलेकीचा मृत्यू झाला. तर चंद्रपुरात उपचारादरम्यान वडिलांनी प्राण सोडला.
माहितीनुसार, या अपघातात दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरमध्ये नेण्यात आलं आहे. ही घटना रविवारला संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये सायत्रा मोतीराम मेश्राम ( वय 65 वर्ष ), मोतीराम भिकारी मेश्राम ( वय – 70 ), कमल उत्तम चूनारकर ( वय 50 वर्ष ) या तिघांचा समावेश आहे. उत्तम चुनारकर (वय 45, रा. चंद्रपूर) आणि अंकित राजू मेश्राम (वय 10, रा. खापरी) हे गंभीर जखमी झाले. खापरी धर्मू येथील मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय कारनं सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी जात होतं. पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार पलटली. या घटनेनं खापरी गावात शोककळा पसरली आहे.





