
मुंबई | राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस राहणार आहे. तर हवामान विभागने राज्यातील काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने बुलढाणा, वर्धा, अकोला, नागपूर आणि अमरावती या 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर रविवारी हवामान विभागाने वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडरचिरोली या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
शनिवारी धुळे, नंदुरबार या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यात नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शनिवार आणि रविवारी उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर भारतात निर्माण झालेल्या पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, मागील आठवड्यामध्ये विदर्भासह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीठ झाली होती. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.





