संविधानाने ओबीसींना योग्य दिशा आणि मार्ग दिला आहे- प्रा. लक्ष्मण गुंजाळ

0
17

बीड : भारतीय संविधान हे अत्यंत परिपूर्ण आणि विकासाभिमुख दिशादर्शक आहे. देशातील प्रत्येक उपेक्षित वंचित शोषित वर्गाच्या हितासाठीच संविधानात तरतूदी आलेल्या आहेत.संविधानाच्या 340 व्या कलमाने ओबीसींच्या उत्थानाचा मार्ग खुला केलेला आहे,परंतु ओबीसींना आपले खरे आदर्श कळालेले नसून शत्रू आणि मित्राची पारख करण्यात कमी पडत आहे. असे स्पष्ट प्रतिपादन प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांनी केले. अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आयोजित आभासी पद्धतीच्या व्याख्यानात (ता. 13 )बोलत होते.’ ओबीसींचे संविधानात्मक स्थान’ या विषयावर 55 वे विचार पुष्प गुंफतांना प्रा. गुंजाळ म्हणाले की स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देखील 52 टक्के ओबीसींच्या वाट्याला उपेक्षाच आलेली आहे. संविधानाने दिलेले 27 टक्के आरक्षण वेगवेगळ्या राष्ट्रविघातक शक्तींनी धोक्यात आणले आहे. कोणत्याही राजकीय पक्ष ओबीसीच्या बाजूने नाही.अगदी फुले शाहुआंबेडकरांचं नाव घेणाऱ्या काही सामाजिक संघटना देखील ओबीसींच्या आरक्षणाला नथीतुन बाण मारण्याचे प्रकार करत आहेत. ओबीसींना एकजुटीने प्रसंगी अप्रिय निर्णय घेऊन सर्वप्रकारचे हक्काचे आरक्षण मिळवावे लागेल.यात बुद्धिवंत आणि तरुणांची मोठी फळी उभी राहण्याची आवश्यकता आहे असेही प्रा. गुंजाळ म्हणाले.
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर अण्णा लिंगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उदघाटन विश्वस्त प्रा. कैलास लगड यांनी केले.सूत्रसंचालन मनीष गिर्हे (अकोला) यांनी तर आभार श्याम वानखेडे (मलकापूर) यांनी केले अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा विश्वस्त शिवशंकर काऊलकर हे ही आभासी व्याख्यानमाला घडवून आणण्यात पुढाकार घेत आहेत. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी आभार प्रदर्शन केले.