
मुंबई,दि.25ः- राज्यात सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईतील गोरेगाव येथे 300 घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली होती. मुंबईबाहेरील आमदारांना मुंबईत घरे मिळत नसल्याच्या व त्यांना भाडेही परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. गृहनिर्माणमंत्र्यांच्या घोषणेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आमदारांना मोफत घरांची गरज काय, असा सवाल भाजपने केला होता. यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमदारांना ही घरे मोफत देणार नाही. त्यांच्याकडून यासाठी शुल्क वसुल केले जाईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
आमदारांना घरे देण्यावरून निर्माण झालेल्या गदारोळाबाबत स्पष्टीकरण देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘आमदारांना मुंबईत देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होत आहे. याबाबत मी स्पष्ट करू इच्छितो की, ही घरे मोफत देण्यात येणार नाही. तर, त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येत आहे. तसेच, बांधकामासाठी साधारण 70 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2022
मोफत घरांवरून सरकारवर टीका
दरम्यान, राज्य सरकारने आमदारांना मोफत घरे दिल यावरून विरोधकांनी आज सरकारवर जोरदार टीका केली. आमदारांना मोफत घरे देण्याची गरज काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसेच, आमदार फुटण्याच्या भीतीतूनच सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता. एसटी संपकऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. सरकारकडे एसटी कर्मचाऱ्यांसाठी पैसे नाही. आमदार दारिद्र्य रेषेखाली येतात काय, असा सवाल त्यांनी केला होता. तर, भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी आमदार काय भिकारी झाले आहेत का, असा सवाल करत या राज्याचा राजा आंधळा, बहिरा आणि मुका झाल्याची टीका केली होती. मनसेचे संदित देशपांडे यांनीही सरकारच्या या निर्णयावर काय म्हणावे, हेच समजत नसल्याचे म्हटले होते.
१) आमदार काही बेघर नाहीत.२) आमदार असणारी व्यक्ती मुंबई नाही तर दुबईतही घर घेऊ शकते.३) त्या जागेवर तेवढ्याच खर्चात शाळा किंवा रुग्णालय उभारुन कमीतकमी खर्चात सुविधा दिल्यातर महाविकास आघाडीचा आदर्श अनेक सरकारे घेतील. तुमचे नाव पुढच्या अनेक पिढ्या घेतील. ४) बाकी तुम्ही सुज्ञ आहात.
— BHAi Khandagale (@BHAiUnmesh) March 25, 2022





