
चिचगड(सुभाष सोनवणे),दि.29ः गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड अप्पर तहसील कार्यलय हद्दीतील घोनाडी गावाला लागुन असलेल्या गाढवी नदीत डोंगा पलटून यात बसलेल्या दोन महिला मजुरांचा पाण्यात बूडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदिवासी नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त असलेल्या चिचगड अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील घोनाडी गावातील काही महिला व पुरूष मजुरी करुन 28 मार्च रोजी सायकांळच्या सुमारास नावेत(डोंग्यात) बसुन घोनाडी गावी परत येत होते. या नावेचे संतुलन बिघडल्याने नदीत नाव पलटी होवून बुडाली. त्यात घोनाडी येथील रेखा विजय वाढई (वय 30) व मनिषा दिनु गुरनुले (वय 31) या महिलांचा बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती रात्री उशीरा पोलिसांनी मिळताच घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.
पोहता येणारे पडले बाहेर
नावेत एकुन 7 ते 8 लोक बसुन गावी कामावरुन परत येत होते. ज्या लोकाना पाण्यात पोहता आले त्यांनी स्वतःला वाचविले. परंतु रेखा व मनिषा यांना पोहता येत नसल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. गोठणगाव धरणात मोठ्याप्रमाणात पाणी असून या धरणाचे पाणी नदीमध्ये असते.त्यामुळे नदीपलीकडे असलेल्या शेतामध्ये भाजीपाला लावण्याकरीता दररोज घोनाडी येथील महिला पुरुष डोंग्याने(नाव) जातात,तसेच घटनेच्या दिवशीही गेले होते.परंतु घटनेच्या दिवशी परततांना नाव चालविणार्याचे संतुलन बिघडले आणि डोंगा पलटून हि घटना घडली.





