35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home महाराष्ट्र ओबीसी समाजाला मोठा लढा उभारावा लागेल – हरिभाऊ राठोड

ओबीसी समाजाला मोठा लढा उभारावा लागेल – हरिभाऊ राठोड

0
22

blank

राष्ट्रीय ओबीसी महासंघव्दारे आयोजित आरक्षण व इतर मागण्यासाठीची राज्यस्तरीय महापरिषद उत्साहात

पुणे,दि.22ः- ओबीसी समाजाचं आरक्षण, जातनिहाय जनगणना यासह विविध प्रकारच्या मागण्या ओबीसी समाज वारंवार करीत आहे. परंतु ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही.त्यामुळे आता राज्यातील सर्व ओबीसी समाजाच्या जातींनी आणि घटकांनी एकत्र येऊन मोठा लढा उभारावा लागेल असे मत ओबीसी समाजाचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पुण्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने आयोजित महापरिषदेत व्यक्त केले.पुढे ते म्हणाले की, जातीय जनगणना करणे मनावर घेतल्यास एक महिन्यात ही पूर्ण होऊ शकते. आज ओबीसी समाज एकत्र नसल्यामुळे कायम दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे भावी पिढीला उज्ज्वल भविष्य द्यायचे असेल तर आता समाजाने एकत्र येणे काळाची गरज असल्याचे राठोड म्हणाले.blank

या महापरिषदेचे उद्घाटन माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि संविधानाचे पूजन करून करण्यात आले.महापरिषदेच्या सुरुवातीला ओबीसी समाजातील देववाले, मरीआई वाले व इतर गोंधळी समाजाच्या वतीने गोंधळ घालून आणि मरीआई देवीची गाणी गाऊन सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जागर करण्यात आला. व ओबीसी प्रहार मासिकाचा ८१ वा  अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले की, ओबीसी समाजाचे भवितव्य खूप अंधारात आहे असे वाटते आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आता याचा विचार केला पाहिजे. आता आपण अनुसूचित जातीतील समाज बांधवांना घेऊन चळवळीत सहभागी झाले पाहिजे. आणि त्यांना आपल्या लढ्यात सहभागी करून घेतले पाहिजे. या वेळी ओबीसी समाजाचे आरक्षण, जातनिहाय जनगणना, क्रिमिलेरची अट रद्द करावी, प्रमोशन मध्ये ओबीसी आरक्षण, मुलांना जिल्हा तालुका निहाय वसतिगृह निर्माण करावी, ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी यासारख्या अनेक प्रश्नांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. तसेच या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाचे व पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले.या महापरिषदेचे आयोजन राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या  वतीने शनिवार दि. १८ जून २०२ रोजी उद्यानप्रसाद मंगल कार्यालय पुणे येथे करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार श्री हरीभाऊ राठोड, माजी आमदार रामहरी रुपनवर,माजी जलसंधारण, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीपराव सोपल, आयएएस अधिकारी आर.के.गायकवाड, प्रा. राजेंद्र कुंभार, भरतकुमार आंबिले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. पी.बी.कुंभार, राष्ट्रीय सरचिटणीस रघुनाथ ढोक व प्रदेश जनरल सेक्रेटरी सुभाष मुळे याची प्रमुख उपस्थिती होती.

या महापरिषदेत चर्चेसाठी  सातारा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रूद्रुके, मराठवाडा अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, सोलापुर जिल्हाध्यक्ष शिवशंकर ढवण, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष ग्रामिण महादेव खराडे यांचेसह राज्यभरातून विविध पक्ष संघटनाचे नेते इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, महीला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

मुख्य उपाध्यक्ष संदिप लचके, समन्वयक दिपक महामुनी, उपाध्यक्ष कैलास नेवासकर, प्रदेश उपाध्यक्षा किरण शिंदे, माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, पुणे शहर अध्यक्ष राकेश खडके, संपर्क प्रमुख विजय कुंभार, उपाध्यक्ष अविनाश मार्तंडे, प्रसिद्धी प्रमुख जोतीराम कुंभार, सुधाकर कुंभार यांचेसह  राष्ट्रीय ओबीसीचे महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने महापरिषदेचे यशस्वी आयोजन केले.याप्रसंगी समाजातील शैक्षणिक, सामाजिक, व्यवसायिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या बांधवांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन विकास माने तर आभार प्रदर्शन जनरल सेक्रेटरी सुभाष मुळे यांनी केले.