माणसांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी करा : लक्ष्मीकांत खाबिया

0
16

Ø  अभंग-भजन स्पर्धेत भंडारा कारागृहातील बंदीजनांचा सहभाग

Ø  ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’

भंडारा, दि. 29 : वाईट विचारांचा विटाळ करा, माणसांचा विटाळ करू नका, असे संत चोखामेळा सांगून गेले. जो माणसाचा विटाळ करतो त्याला जीवनप्रवासात यशप्राप्ती कमी होते. पण जो माणसांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी करतो, चांगल्या विचारांचे आदानप्रदान करतो तो जीवनमार्गात यशस्वीपणे वाटचाल करीत असतो. कारागृहातून बाहेर पडताना चागंले विचार घेऊन बाहेर पडा; नवीन जीवनाला सुरुवात करा, असे आवाहन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा मध्यवर्ती कारागृह वर्ग एक येथे आयोजित स्पर्धेत बंदीजनांनी सहभाग नोंदवत ‘तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता’, ‘मनी नाही भाव देवा मला पाव’, ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’, ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या रचना सादर केल्या. त्या वेळी खाबिया यांनी बंदीजनांशी संवाद साधला.

वरीष्ठ कारागृह अधीक्षक अमृत आगाशे, तुरुंग अधिकारी बी. आर. चोपकर, तुरुंग अधिकारी एस. पी. क्षीरसागर, पोलीस कर्माचरी सोमेश निंबारकर, सचिन आटे, भंडाऱ्याचे भजन स्पर्धा प्रमुख रोशन खोब्रागडे, प्रतिष्ठानचे भंडारा जिल्हाध्यक्ष नारायण जुवार, संगीत शिक्षक राजीव नानोटी, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजय मिसाळ, शंकर धुमाळ आदी उपस्थित होते.

स्पर्धेद्वारा चांगल्या विचारांची जपणूक

आत्म्याला जर परमात्म्याला भेटायचे असेल तर अध्यात्माशिवाय दुसरे साधन नाही. आपल्या वाईट विचारांना दूर करून चांगल्या विचारांची जपणूक करण्यासाठी भजन आणि विठ्ठलाचे नामस्मरण उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे प्रतिष्ठानने बंदीजनांसाठी आयोजित केलेली स्पर्धा उपयुक्त आहे. – अमृत आगाशे, कारागृह अधीक्षक, भंडारा

चांगल्या विचारांचा प्रवास सुरू राहिल

स्पर्धेच्या निमित्ताने कारागृहातील बंदीजनांनी या उपक्रमाबद्दल मते नोंदविली. योगेश बैद म्हणाला, जेव्हा कारागृहात आलो तेव्हापासून निट झोपू शकत नव्हतो. आता चांगली आणि शांत झोप लागत आहे, कारण आता आम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहोत. महेश निंभोरले म्हणाला, स्पर्धेमुळे कारागृहात भक्तीचे वातारवण तयार झाले आहे. माझ्या स्वत:च्या आचार आणि विचारात फरक पडला आहे. सोमेश्वर पारधी म्हणाला, भजन स्पर्धा आणि विठ्ठलनामामुळे वाईट विचारांची जागा चांगल्या विचारांनी कधी घेतली हे कळलेच नाही. चांगल्या विचारांचा प्रवास स्पर्धेमुळे असाच सुरू राहिल.

विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र

महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.