
औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर ही बैठक होतेय, हे विशेष.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्यात येत आहेत. यावेळी ते मराठवाड्याच्या विकासासाठी काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबादमध्ये याआधी 2016 मध्ये ही बैठक झाली होती. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. आता बरोबर सहा वर्षांच्या मोठ्या खंडानंतर पहिल्यांदाच शहरात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आहे. मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवातही याच दिवशी होत आहे.
दोन दिवसांत घोषणा
सूत्रांच्या माहितीनुसार, हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाला (17 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. औरंगाबादमध्ये 2009 नंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली नव्हती. त्यानंतर थेट 2016 मध्ये बैठक झाली त्यानंतर थेट 2016 मध्ये आणि आता 2016 नंतर 2021 मध्ये ही बैठक घेत आहे.
समस्या सोडवतील की…
अनेक समस्या या मराठवाड्याच्या पाचवीलाच पूजलेल्या आहेत. सध्या ओल्या दुष्काळामुळे पिके संकटात आहेत. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतील याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरही समस्यांशी झुंंजत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते, खड्डे, कचरा या झाल्या नागरी समस्या मात्र अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थाही शहरात येता येता दुसरीकडे वळवण्यात आल्या. त्यामुळे निराश औरंगाबादकरांच्या नशिबी काय? हा प्रश्न कायम राहतो.





