
दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०६ ऑगस्ट, २०२२ व दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.
या परीक्षेमध्ये सांगली जिल्ह्यातील मंजूनाथ गोपाळ पाटील हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागास वर्गवारीतून हिंगोली जिल्ह्यातील ओमेश किसन पायघन प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील श्रीमती अंकिता सुरेश पाचंगे ह्या प्रथम आल्या आहेत.उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
मुंबई, दि.८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ व २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण ६०९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पडुळ अक्षय दिवाण हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून सांगली जिल्ह्यातील नम्रता ज्ञानदेव म्हस्के ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून जळगाव जिल्ह्यातील अक्षय अनिल परदेशी हे राज्यात प्रथम आले आहेत.उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे.





