
पुणे :-जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे.या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील.
IWG सदस्य राष्ट्रे, अतिथी राष्ट्रे आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. यादरम्यान ते भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली २०२३ च्या पायाभूत सुविधांच्या अजेंडावर चर्चा करतील.नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की ही जी 20 ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धनयवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत.”
“शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर दृष्टिकोन बदलतो”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली.’जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्त्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. भरड धान्य आणि त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांची श्री.राणे यांनी विशेष माहिती घेतली.महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आखलेल्या पर्यटन उपक्रम, सहलींचे पॅकेजेस आदीविषयी सादरीकरणदेखील त्यांनी पाहिले.यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
000





