सडक अर्जुनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महात्वाकांक्षी योजना हर घर नल, हर घर जल देण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे. यात प्रत्येक घरात मुबलक पाणी देण्याचा मानस शासनाचा आहे. त्या अनुषंगाने सडक अर्जुनी तालुक्यातील बौद्धनगर येथे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी मंत्री बडोले म्हणाले की, पाण्याची समस्या हि फार मोठी समस्या असून देशाला ७५ वर्षे होऊन सुद्धा हि समस्या समस्याच आहे. यावर पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या स्तरावर प्रत्येक घरात पाणी पोचवण्याचे कार्य हाती घेतले असून क्षेत्रातील नागरिकांची पाण्यासाठीची होणारी पायपीट थांबेल. याचा लाभ घरातील महिलांना मोठ्या प्रमाणत होणार आहे.
दरम्यान जिल्हा परिषद सदस्य निशाताई तोडासे, पंचायत समिती सडक अर्जुनीचे उपसभापती शालिंदर कापगते, पंचायत समिती सदस्य डॉ. रुकिराम वाढई, सपनाताई नाईक, माजी सभापती पद्माताई परतेकी, लक्ष्मीकांत धानगाये, देवाजी बनकर, डॉ. सुशील लाडे, बिरला गणवीर, संरपच प्रिती राऊत, उपसरपंच हरीचंद्र कोसमे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.