
नागपूर: भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर झाला असून भारतातील वाघांची संख्या २०२३ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ‘प्रोजेक्ट टायगर’ ला ५० वर्ष पूर्ण झाल्याबाबत भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. नवीन आकडेवारीनुसार, देशातील वाघांची संख्या २,९६७ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. २००६ मध्ये वाघांची संख्या १,४११, २०१० मध्ये १,७०६, २०१४ मध्ये २,२२६, व २०१८ मध्ये २,९६७ इतकी होती. पंतप्रधान मोदीं यांनी अमृतकाळा दरम्यान वाघांच्या संवर्धनासाठी सरकारचा दृष्टीकोन देखील प्रकाशित केला. तसेच ‘आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स’ची देखील सुरुवात केली. ‘प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ नाण्याचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
Project Tiger leads the way in protection and conservation of the big cats. https://t.co/53B9nwsNkt
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2023
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले व्याघ्र प्रकल्पाचे यश हे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद आहे. वन्यजीवांच्या भरभराटीसाठी, परिसंस्थेची भरभराट होणे महत्त्वाचे आहे. हे भारतात होत आहे. भारताने वाघांचे केवळ संरक्षणच केले नाही तर त्यांना भरभराटीसाठी एक परिसंस्थाही दिली आहे. भारत असा देश आहे जिथे निसर्गाचे रक्षण करणे हा संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच वन्यजीव संवर्धनात अनेक अद्वितीय यश मिळवले आहे. जगाच्या केवळ २.४ टक्के भूभागासह, जागतिक विविधतेमध्ये भारताचा वाटा सुमारे आठ टक्के आहे.





