
मुबंई- राज्यात चालू आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठे विधान व्यक्त केले. एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल असे वक्तव्य केले आहे. यामुळे मविआच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे.
काॅंग्रेस नेत्याशी बोलताना विधान
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका काँग्रेस नेत्यासोबत बोलताना ‘मला एकट्याला भाजपसोबत लढावे लागेल’ असे विधान केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकासआघाडी टिकणार का? आघाडीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या सुरस चर्चा रंगल्या. तर दुसरीकडे शरद पवारांनी पक्ष एकसंध असून सर्व सहकाऱ्यांची पक्ष शक्तिशाली करण्याची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया देत या चर्चांना स्वल्पविराम दिला आहे. त्यावर अजित पवार यांनी अशा चर्चांना पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी आणि सत्ता
राज्याच्या राजकारणात उलथापालथी होत आहेत. एकीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सलग दहा वर्षे सत्ता उपभोगली. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेहमी सत्तेला महत्व देते. राष्ट्रवादीच्या उदयानंतर २०१४ साली शरद पवारांच्या पक्ष प्रथमच विरोधी बाकावर बसला. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार होते. त्यानंतर २०१९ ला शिवसेना भाजप युतीचे बिनसले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसचा हात आणि घड्याळाची साथ घेत राज्यात सत्ता स्थापली. जेमतेम अडीच वर्ष सरकार चालले. त्यानंतर फूटीच्या राजकारणाचा फटका मविआला बसला.
शरद पवार आणि बदलती राजकीय भुमिका
- शरद पवार यांची राजकीय भुमिका नेहमीच बदलती राहीली. ते एकाच गोष्टीवर ठाम असातात असे नाही. त्यामुळे त्यांच्या भुमिकेला सहज घेतले जात नाही. शरद पवारांनी २०१४ ला भाजपला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा देऊ केला होता.
- अर्थात सलग दहा ते अकरा वर्षे काॅंग्रेसोबत सत्ता भोगल्यानंतर २०१४ ला आघाडीची हार झाली. या काळात शरद पवारांनी सत्तेसाठी भाजपची साथ देण्याची जाहीर भुमिका घेतली. पण नंतर विरोधी पक्षात बसले.
- नुकत्याच नागालॅंडमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत सात जागा पवारांच्या पक्षाने पटकावल्या. विरोधी पक्षात राहणार असल्याचे पवारांनी सांगितले नंतर सरकारमध्ये सामिल झाले.
- अर्थात शरद पवारांची भुमिका नेहमी भोवऱ्यासारखी राहीली आहे. याची चांगलीच जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. ती एक बाब आणि अलिकडे राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक तसेच अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या त्यातून उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले असे दिसून येते.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, आपण जे वेगवेगळ्या आमदारांची भेट झाल्याचे दाखवत आहात, ते सर्व विविध कामानिमित्त आले होते. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादीतच राहणार आहोत. जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादीच राहू, आता हे शपथपत्रावर लिहून द्यायचे का? असा सवालही त्यांनी केला.
अस्थिरता कायम
शंका, कुशंकेच्या वादळानंतर एकीकडे अजित पवार राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे बोलतात. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे भाजपविरोधात एकटे लढण्याची भाषा करतात त्यामुळे मविआतच नव्हे तर राज्याच्या राजकारणातच आलबेल दिसून येत असून राज्यात राजकीयदृष्ट्या स्थिर वातावरण नाही हेही स्पष्ट होते.





